मुंबई – रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर दरवाढ होणार आहे. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो असे विश्लेषकांनी सांगितले. करोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था अगोदरच कमकुवत झाली असताना या युद्धाचा अर्थव्यवस्थेवर पुन्हा परिणाम होणार आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे भारताच्या वित्तीय तुटीवर परिणाम होणार आहे. चालू खात्यावरील तूट वाढल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम होणार आहे.
महागाई वाढणार
अर्थसंकल्प तयार करताना क्रुडच्या किमती 75 ते 80 डॉलर गृहीत धरण्यात आल्या होत्या. मात्र आता या किमती 140 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारच्या सर्व समीकरणावर परिणाम होणार असल्याचे एचडीएफसी बॅंकेचे मुख्य अर्थतज्ञ अभिक बरुवा यांनी सांगितले. जर कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरवर राहिले तर त्यामुळे विकासदर 0.9 टक्क्यांनी कमी होऊन आठ टक्क्यावर जाऊ शकतो. त्याचबरोबर महागाईचा दर एक टक्क्याने वाढून सात टक्क्यावर जाऊ शकतो. चालू खात्यावरील तूट 1.20 टक्क्यांनी वाढून 2.4 टक्के होऊ शकते. अशा अवस्थेत रुपयाच्या मूल्यावर दबाव येणार आहे.
महसूल कमी होणार
कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर भारत सरकारला पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीत वाढ करावी लागणार आहे. मात्र या किमती अगोदरच जास्त असल्यामुळे असंतोष आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार इंधनावरील उत्पादन शुल्कात काही प्रमाणात घट करू शकते. तसे झाले तर सरकारच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे सरकारची वित्तीय तूट वाढण्याचा धोका संभवतो. उत्पादन शुल्क एक रुपयाने कमी केल्यानंतर सरकारच्या तिजोरीवर 130 अब्ज डॉलरचा भार पडतो. ती तूट कमी करण्यासाठी एलआयसीचा आयपीओ बाजारात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र त्यासाठी पोषक वातावरण नाही.