संगमनेर – कर्नाटकमधील विजय हा मोठा असून, तो जनतेचा विजय आहे. भाजपने सुरू केलेले दहशतीचे आणि जातिभेदाचे राजकारण नागरिकांना मान्य नसून, कर्नाटक विधानसभा निकालाने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी कॉंग्रेस सरकारची गरज असून, भाजपची आता घसरण सुरू झाल्याचे प्रतिपादन आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या विजयाचा आनंद संगमनेरमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोषात साजरा केला. या वेळी आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले की, सन 2014मध्ये भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने राजकारणासाठी स्वायत्त संस्थांचा वापर केला आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढलेली असताना धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपची कार्यपद्धती ही दहशतीची आणि द्वेषाची असून, समाजा-समाजात तेढ निर्माण करत आहे. यामुळे भारतातील नागरिक बंधू-भगिनी अस्वस्थ आहेत.
जनतेमधील ही अस्वस्थता दूर करण्यासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी 3 हजार 560 किलोमीटरची भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व ठरली आहे. या यात्रेतून हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक मध्ये कॉंग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी असून, देशात मोठी परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून, देशात व महाराष्ट्रातही परिवर्तन नक्की होणार असल्याचे आ. थोरात यांनी म्हटले आहे.