राजगुरूनगर -खेड तालुक्यातील भोरगिरी-भीमाशंकर परिसरातील नयनरम्य धबधबे सुरु झाले आहेत. करोना विषाणू संसर्गामुळे या भागात पर्यटक बंदी केल्याने आदिवासी नागरिकांचा मोठा रोजगार बुडाला आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भोरगिरी, भीमाशंकर परिसरात सध्या जोरदार पाऊल पडत आहे. या भागातील मोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत. मोरोशी-शिरगाव जवळील नेकलेस, भोरगिरीचा एन्जॉय पॉईंट, हरामी आणि भोरगडा समोरील पाच धबधबे, मंदोशी घाटातील धबधबा, कारकुडीचा उंच धबधबा बघण्यासाठी पर्यटकांनी दरवर्षी मोठी गर्दी होते. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत. स्थानिक नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होते .
असे असताना यावर्षी मात्र ते येणार नसल्याने आदिवासी नागरिकांना रोजगार मिळणार नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. अगोदरच करोनाच्या संकटामुळे रानमेव्याचा बाजारपेठ मिळाली नाही त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले त्यातच आता पावसाळ्यातील पर्यटनाला संधी असताना आणि रोजगार हमखास मिळणार असताना करोनाचे संकट आल्याने आदिवासीच्या रोजगाराच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
करोनाचे संकट असल्याने वर्षाविहार करण्यासाठी शासनाने बंदी केली आहे. वर्षाविहार करण्यासाठी पुणे मुंबई आदी शहरातील तरुणाई व नागरिक लोणावळा, भुशी डॅम, माळशेज घाटात गर्दी करतात यावर्षी येथे पर्यटनास बंदी असल्याने हे पर्यटक भोरगिरी परिसरात येण्याची शक्यता असल्याने खेड प्रशासनाने या परिसरात वर्षाविहारा व धबधब्यांवर जाण्यास मनाई हुकूम काढला आहे.
पोलिसांचा ताण कमी
खेड तालुक्यातील चासकमान आणि कळमोडी धरण निसर्गाच्या सानिध्यात असल्याने दरवर्षी या धरणांवर पर्यटकांची गर्दी होते. सुरक्षेसाठी पोलीस यंत्रांना दरवर्षी येथे तैनात करण्यात येते. यावेळी करोनाचे संकट असल्याने मुळातच पर्यटक येणार नसल्याने पोलिसांचा ताण कमी होणार आहे तर धरण प्रशासनाची डोकेदुखी थांबणार आहे. तरीही धरणांच्या आजूबाजूला चोरून पर्यटक जा ये करणार असल्याने त्यांच्यवर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवणार आहे.