गोरखपूर – आर्थिक चणचण असूनही जनतेला धार्मिक पुस्तके कमी किमतीला उपलब्ध करून देणे कौतुकास्पद आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोरखपूरच्या यांनी गीता प्रेसचे कौतुक केले.गोरखपूर येथील गीता प्रेसच्या शतकमहोत्सवी समारंभाला राष्ट्रपती शनिवारी उपस्थित राहिले होते. त्यावेळी ते बोलत होते.
भारतामधील अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ज्ञान आपल्या प्रकाशनांमधून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात गीता प्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्या वेळी गीता मूळ स्वरुपात, योग्य अर्थासह कमी किमतीला सहज उपलब्ध नव्हती, त्यावेळी ती जनसामान्यांना उपलब्ध करून देणे हा गीता प्रेसच्या स्थापनेमागचा उद्देश होता, कोलकाता येथून सुरू झालेला हा छोटासा उपक्रम आता देशभर आपल्या कामासाठी प्रसिद्ध आहे ही गोष्ट अभिमानाची असल्याचं ते म्हणाले.
भगवद्गीते व्यतिरिक्त गीता प्रेसने रामायण, पुराणं, उपनिषदे. भक्त-चरित्र आणि अन्य पुस्तके प्रकाशित केली आहेत. आतापर्यंत 70 कोटी पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित करून गीता प्रेसने विक्रम नोंदवला असून हिंदू धार्मिक पुस्तके प्रकाशित करणारी ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था असल्याचे ते म्हणाले.
गीता प्रेसच्या “कल्याण’ मासिकाला अध्यात्मिक दृष्टीकोनातून संग्रह करण्याजोगे साहित्य म्हणून मनाचे स्थान आहे. हे कदाचित भारतामधील सर्वात जास्त वाचले जाणारे धार्मिक मासिक असू शकेल असे राष्ट्रपती म्हणाले.
गीता प्रेसच्या परदेशामध्ये शाखा सुरु करण्याच्या योजनेमधून जगाला भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा लाभ मिळेल. परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय जगाला आपल्या देशाशी जोडणारे भारतीय संस्कृतीचे दूत असतात, त्यामुळे गीता प्रेसने त्यांच्याशी चांगले संबध प्रस्थापित करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
गीता प्रेसच्या सध्याच्या 1850 प्रकाशानांपैकी अंदाजे 760 प्रकाशनं संस्कृत आणि हिंदी मधील तर उरलेली गुजराती, मराठी, तेलुगु, बंगाली, ओरिया, तामिळ, कन्नडा, असामीस, मल्याळम, नेपाळी, उर्दू. पंजाबी आणि इंग्रजी या अन्य भाषांमध्ये आहेत, यामधून भारतीय संस्कृतीची विविधतेमधील एकता दिसून येते. भारतीय संस्कृतीचा धार्मिक आणि अध्यात्मिक पाया एकच आहे असे राष्ट्रपती म्हणाले.
संत कबीर अकादमी आणि संशोधन केंद्राचे’ उद्घाटन
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज उत्तरप्रदेशात मगहर येथे कबीर चौरा धाममध्ये ‘संत कबीर अकादमी आणि संशोधन केंद्राचे’ उद्घाटन तसेच ‘स्वदेश दर्शन योजनेचा’ प्रारंभही त्यांनी केला. संत कबीर यांना पुस्तकी ज्ञान मिळाले नसले तरी, संतसज्जनांच्या सहवासातून त्यांनी अनुभवजन्य ज्ञान मिळवले. त्या ज्ञानाचे स्वतः प्रयोग करून खात्री पटल्यावर ते आत्मसात करून मगच ते लोकांपर्यंत पोहोचवत असत. म्हणूनच आजही त्यांनी दिलेली शिकवण बहुजनांना आणि अभिजनांनाही तितकीच भावते, असेही राष्ट्रपती म्हणाले.