औरंगाबाद – औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेला आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथे मोठी सभा झाल्यानंतर या विषयाला तोंड फुटले. राज यांनी या सभेत मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला होता. शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करावे अशी भूमिका खूप पूर्वी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच घेतली होती. मात्र आता त्यांचे पुत्र उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरही हे नामांतर होत नसल्यामुळे या विषयाचे पडसाद उमटत आहेत.
त्यातच आता संभाजीनगर असे नामकरण केले जावे अशी मागणी आता शिवसैनिकांतूनच येते आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा विषय तापत जाण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविषयी विधान केले आहे. नामांतराची कागदोपत्री प्रक्रिया व संपुर्ण फाईल तयार झालेली आहे. ही नवी नावे कधीही घोषित होतील. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदेशीर बाबी पूर्ण करणार आहेत, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. औरंगाबाद नामांतराला कॉंग्रेसने विरोध दर्शविलेला आहे. तसेच नामांतरापेक्षा आम्ही विकासाला अधिक महत्त्व देतो, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली होती. तसेच शिवसेनेने नामांतराचा मुद्दा उचलून धरल्यानंतर मित्रपक्षांनी किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली होती.