नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल उत्तरप्रेशातील आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेचा उपयोग केला. त्यांचा हा रेल्वे दौरा त्यांच्यासाठी संस्मरणीय होताच पण राष्ट्रपतींच्या या रेल्वे प्रवास व्यवस्थेसाठी रेल्वेच्या ज्या कर्मचाऱ्यांनी योगदान दिले त्यांच्यासाठीही हा त्यांचा दौरा स्मरणीय ठरला.
राष्ट्रपतींसाठी नियमानुसार या विषेश रेल्वे गाडीमध्ये विशेष डबा होता. त्याला सलून कार असे म्हणतात. पण राष्ट्रपतींनी त्या व्यवस्थेचा उपयोग न करता अन्य डब्यातून त्यांनी हा प्रवास केला.
त्यांचे मूळ गाव कानपुर ग्रामीण जिल्ह्यातील परौख हे आहे. ते तेथे या विशेष रेल्वेने पोहचले.दिल्ली ते कानपुर या दौऱ्यात त्यांच्या गाडीला झिंजक आणि रूरा या दोन स्थानकांवर थांबे देण्यात आले होते. या स्थानकांवर ते खाली उतरून सामान्य लोकांमध्ये वावरले आणि त्यांनी त्यांना संबोधितही केले.
रेल्वेने प्रवास करताना आपल्याला अपुर्व समाधान झाल्याची बाब त्यांनी यावेळी नोंदवली. त्यांच्या गाडीचे चालक संजयकुमार सिंह यांनी सांगितले की, आमच्यासाठी राष्ट्रपतींना त्यांच्या ईप्सित स्थळी नेणे हा अभिमानाचा क्षण होता. खुद्द राष्ट्रपतींनी रेल्वेतून प्रवास केल्याचे पाहिल्यानंतर देशातील अन्यही लोक पुन्हा रेल्वे प्रवासाकडे वळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या आधी रामनाथ कोविंद यांनी सन 2006 मध्ये रेल्वे प्रवास केला होता. त्यावेळी त्यांनी तत्कालिन राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या समवेत दिल्ली ते डेहराडून असा प्रवास केला होता. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद हे नेहमीच रेल्वेने प्रवास करीत असत. राष्ट्रपतींच्या या रेल्वे प्रवासासाठी रेल्वेने नागरी प्रशासनाच्या मदतीने विशेष व्यवस्था केली होती. त्यांच्या मार्गावरील रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेसाठीही खूप मोठी यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली होती.
राष्ट्रपती जेव्हा दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकातून आपल्या गाडीत चढले त्यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी रेल्वेमंत्री पीयुष गोयलही रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. राष्ट्रपती 29 जून रोजी उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावरून दिल्लीत परतणार आहेत.