सातारा – सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षकपदी उज्वल वैद्य यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कारवायांची गती वाढवणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या सेवानिवृत्तीनंतर या पदाचा हंगामी पदभार सांगलीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष सुजय घाडगे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
सुमारे पाच महिने प्रभारी म्हणून घाडगे यांनी काम पाहिले. या काळामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा कारवाया केल्या. दरम्यान उपअधीक्षकपदी उज्वल वैद्य गुरुवारी हजर झाल्या. त्यांनी यापूर्वी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच राज्य गुप्त वार्ता विभाग येथे वरिष्ठ पदांवर काम केले असून त्यांना गुन्हे उघडकीस आणण्याचा मोठा अनुभव आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, सातारा प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात वीस कारवाया केल्या आहेत.
या वर्षांमध्ये या कारवायांची संख्या निश्चितच वाढवणार असून भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करावे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये या संदर्भातील जनजागरण करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. गोपनीय माहितीसाठी नागरिकांनी 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. तक्रारदाराने जर कायम राहून आपली फिर्याद नोंदवली तर प्रथम श्रेणी वर्गाचे अधिकारी सुद्धा दोषी असल्यास या कारवाईतून सुटू शकणार नाहीत.
कारवाईचा पाया जितका ठोस तितके शिक्षा लागण्याचे प्रमाण अधिक असते. या प्रकरणांमध्ये गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागण्याचे प्रमाण हे 15 ते 18% आहे हे प्रमाण तुलनेने कमी असले तरी दरम्यान कालावधीमध्ये कर्मचारी निलंबित होतो. त्यामुळे सातारा विभागाच्या गुणात्मक कारवाया कशा वाढतील याकडे आपण लक्ष देणार आहोत.