पुणे -आर्थिक अडचणीमुळे वीजबिल भरता आले नसल्याने कनेक्शन बंद झालेल्या ग्राहकांना बिलावरील व्याज आणि दंड माफ करण्याच्या महावितरणच्या योजनेचा पुणे विभागातील 3,886 ग्राहकांना लाभ झाला. या ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. तर राज्यातील 43345 ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
करोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक वीज ग्राहकांना वेळेत बिले भरता आली नव्हती. त्यांच्या बिलाची थकबाकी होती. बिलाच्या मूळ रकमेवर व्याज जमा झाले होते. शिवाय दंडात्मक रक्कमही भरणे गरजेचे होते. यामुळे थकित रक्कम अधिक वाढली होती. थकित बिलामुळे वीज कनेक्शन तोडले गेले होते. अशा ग्राहकांना वीजपुरवठा पुन्हा सुरू व्हावा म्हणून महावितरणने “विलासराव देशमुख अभय योजना’ लागू केली होती. त्यानुसार संबंधित ग्राहकांनी बिलाची मूळ रक्कम भरली तर त्यांना बिलाच्या रकमेवरील व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेची नुकतीच संपली. या योजनेमध्ये प्रामुख्याने घरगुती ग्राहकांनी या योजनेत वीजबिलांची मूळ रक्कम भरून पुन्हा वीज कनेक्शन जोडून घेतले.
योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यभरातील एकूण 30, 571 घरगुती ग्राहकांपैकी सर्वाधिक 14,505 ग्राहक कोकण विभागातील आहेत. त्यांच्या खालोखाल औरंगाबाद विभागातील 7,960, ग्राहक आहेत.