पुणे – आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीचे काम करताना त्यात अडथळा ठरणारी अतिक्रमणे पाडणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शांतनु गोयल यांनी स्पष्ट केले. या भिंतीचे काम लवकरच हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंबिल ओढ्याची सीमाभिंत अनेक ठिकाणी पडली आहे तर अनेक ठिकाणी त्याची उंचीही कमी आहे. त्यामुळे ती लेव्हल करणे आणि बांधणे ही कामे लवकरच करण्यात येणार आहेत. मात्र, ओढ्यालगतच असलेल्या अतिक्रमणांचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे या कामात अडथळा येत असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले होते. शिवाय याचे मार्किंग विकास आराखड्यावर करून देण्यात यावे असेही, संबंधित विभागाने सांगितले होते.
मात्र, येथे प्रत्येक ठिकाणाची पाहणी करण्यात आल्याचे, डॉ. गोयल यांनी सांगितले. त्यातून 60-70 टक्के जागा मोकळी आहे. मात्र, ही भिंत बांधताना अतिक्रमणांचे अडथळे आल्यास ते काढून टाकले जाणार आहेत, अशा अतिक्रमणांना नोटीसाही दिल्या आहेत, असे गोयल यांनी नमूद केले.
बुधवारी झालेल्या पावसात काही खासगी गृहसंकुलांच्या सीमाभिंती कोसळण्याचे प्रकारही घडले आहेत. याशिवाय आंबेगाव, आळंदी रस्ता, सहकारनगर, चंदननगर वगैरे भागात पाणी पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. कसबा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने काही नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले, त्यांचे साने गुरूजी वसाहत आणि महापालिका कॉलनींमध्ये स्थलांतर करण्यात आले.