नवी दिल्ली – पाकिस्तानच्या जनतेने निवडणुकीतून दिलेला जनादेश पीएमएल-एन पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीने रात्रीच्या अंधारात चोरल्याचा आरोप इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने केला आहे. पीटीआय पक्षाचे माध्यम सचिव रौफ हसन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ही टीका केली आहे.
पीएमएल-एनने अन्य पक्षांबरोबर आघाडी केल्यानंतर पीटीआयने ही टीका केली आहे. ही आघाडी म्हणजे गुन्हेगारांनी मिळून सरकार स्थापन करण्यासाठी केलेली टोळी असून या सर्वांना जनतेने नाकारले होते. देशासमोर असलेल्या गंभीर समस्यांबाबत लघुदृष्टी असल्याचे या आघाडीवरून दिसते, असेही ते म्हणाले.
पीटीआयचा पाठिंबा असलेल्या अपक्षांनी निवडणुकीमध्ये सर्वाधिक ९२ जागांवर विजय मिळवला होता. स्वतः इम्रान खान तुरुंगात असताना आणि निवडणूक चिन्ह नसतानाही पक्षाने हे यश मिळवले आहे. मात्र सध्याच्या घडामोडींवरून राष्ट्रीय हिताचा आणि जनतेच्या कल्याणाचा तिरस्कार करण्याची वृत्तीच दिसून येते, असेही पीटीआयच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.