जम्मू – पाकिस्तान रेंजर्सनी बुधवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आंतरराष्ट्रीय सीमेलगत मारा केला. त्या पाकिस्तानी कुरापतीला भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तान रेंर्जसनी सीमेलगत जम्मू विभागात असणाऱ्या बीएसएफच्या चौकीला लक्ष्य करून गोळीबार केला. त्यानंतर बीएसएफच्या सतर्क जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये सुमारे २० मिनिटे धुमश्चक्री झाली.
सुदैवाने त्यामध्ये भारतीय बाजूची कुठलीही हानी झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २० फेब्रुवारीला जम्मूत सभा होणार आहे. अशात पाकिस्तानने आगळीक केल्याची घटना घडली. त्यामुळे सीमेलगत तैनात असणाऱ्या बीएसएफसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याआधी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर तीन महिन्यांनी पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढली. त्या देशात नुकतीच सार्वत्रिक निवडणूक झाली.
गडबड-गोंधळाने गाजलेल्या त्या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. त्यानंतर सरकार स्थापनेची कोंडी फोडण्यासाठी तेथील राजकीय पक्षांना कसरती कराव्या लागत आहेत. तशातही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच असल्याचे शस्त्रसंधी भंगाच्या ताज्या घटनेवरून स्पष्ट झाले.