बंगळुरू : येथे विरोधी पक्षाच्या दोन दिवसांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. एकूण 26 पक्ष या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. या बैठकीत आघाडीच्या नावाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचं नाव INDIA ठेवलं आहे. या नावाचा फूलफॉर्म (Indian National Democratic Inclusive Alliance)असल्याचं सांगण्यात आलं आहे.
विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, समन्वयासाठी 11 सदस्यांची समिती स्थापन करून लवकरच आघाडीचे कार्यालय स्थापन केले जाईल. मुंबईत होणाऱ्या आमच्या पुढील बैठकीत त्याची घोषणा केली जाईल.
खर्गे पुढे म्हणाले की, भाजपने ईडी, सीबीआय आदी लोकशाहीच्या सर्व यंत्रणा उद्ध्वस्त केल्या आहेत. आमच्यात राजकीय मतभेद आहेत, पण देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
राहुल गांधी म्हणाले की, आज देशाचा आवाज दाबला जात आहे. INDIA हे नाव निवडले कारण ही लढत NDA आणि भारत (INDIA) यांच्यात आहे, मोदी आणि भारत यांच्यात आहे. भारता (INDIA)विरुद्ध कोणी उभं राहिलं तर कोण जिंकेल हे तुम्हाला माहीत आहे.
भारताच्या कल्पनेवर हल्ला होतोय, तो हल्ला भाजप करत आहे. बेरोजगारी वाढत आहे, अब्जाधीशांना फायदा होत आहे, जे मोदींच्या जवळ आहेत.
आरजेडी आणि टीएमसीने आधीच जाहीर केलं होतं नाव…
तत्पूर्वी, बैठकीत सहभागी झालेल्या राष्ट्रीय जनता दलाने विरोधी पक्षांची युती हे भारताचे प्रतिबिंब असल्याचे ट्विट केले होते. RJD ने यासोबत लिहिले होते की, “आता पंतप्रधान मोदींना INDIA भारत म्हणताना त्रास होईल.”
टीएमसी खासदाराने “चक दे इंडिया” असं ट्विट केले होते तर दुसरीकडे, काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी आपल्या ट्विट मध्ये “भारत INDIA जिंकेल” असं लिहलं होतं.