नाशिक : सध्या राज्यासह देशभरात मुंबईचे माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांच्या पत्राची आणि त्यातून सिंह यांनी केलेल्या आरोपांचीच चर्चा जोरात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात नक्कीच हा चर्चेचा विषय आहे. नक्कीच सनसनाटी आणि खळबळजनक पत्र आहे. लोक म्हणतात हा लेटर बॉम्ब मात्र यात सत्यता किती आहे हे मुख्यमंत्री आणि पवार साहेब तपासून बघतील. या प्रकरणी स्वतः अनिल देशमुख यांनी पत्राच्या चौकशीची मागणी केली आहे. मात्र प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे . अशा प्रकारचे आरोप होत आहेत हे दुर्दैवी आहे”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांनी हे सरकार यावं म्हणून खारीचा वाटा उचलला अशा आमच्या सारख्यांसाठी हे धक्कादायक आहे. सरकारमधल्या प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. सरकारला दीड वर्ष झाले पण आता आपले पाय प्रत्येकाने तपासले पाहिजे नक्की जमिनीवर आहेत का? माझी यात वैयक्तिक भूमिका नाही. मात्र पोलीस प्रशासन हा कोणत्याही सरकारचा कणा असतो. महाराष्ट्राला कणा आहे असं आपण म्हणतो, पोलिसांकडे आम्ही कणा म्हणून पाहतो, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, आमची राजवट देखील उत्तम चालली आहे, पण काही तरी दुरुस्त करावं लागेल. आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त आहेत. एका प्रकरणात त्यांना पदावरून जावं लागलं आहे. त्यांच्या कामाबाबद्दल कौतुक आहे पण त्यांच्या पत्रावर तपास करावा असे स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. योग्य भूमिका आणि निर्णय घेण्यासाठी पवार साहेब भूमिका पार पाडतील, मी आज पवार साहेबांशी दिल्लीत भेटेल, असंही संजय राऊत म्हणाले.
विरोधी पक्षाने मागणी केली म्हणून सरकार चालत नाही. 72 तासात सरकार वर शिंतोडे उडाले हे मान्य करण्याचा मोठेपणा माझ्याकडे आहे. यातून कस धुवून काढायचं यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यानी सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. काही गोष्टींवर योग्य वेळी निर्णय घेणे अपेक्षित होतं, पण सत्तेपुढे शहाणपण नसतं, असेही ते म्हणाले.