‘जीत के खातिर जुनून चाहिये
जिसमे उबाल हो ऐसा खून चाहिये..
ये आस्मान भी आएगा जमीनपर
बस, इरादोमे जीत की गुंज चाहिये !’
‘तो आला, त्याने पाहिलं, तो लढला, आणि त्याने जिंकलं !’ साधारणपणे कोणत्याही राजपुत्राची ही कथा असू शकते. पण काही राजपुत्र असेही असतात, ज्यांच्याबाबतीत हे वाक्य खरे ठरत नाहीत! मात्र आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने ते सगळ्यांना ‘त्याने जिंकलं’ म्हणायलाच लावतात. असेच काहीसे पार्थ पवारांच्या बाबतीत घडत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने उदयास येणाऱ्या तरुण नेत्यांच्या फळीत पार्थ पवार यांचं नाव येतं. राजकारणात प्रवेश करतानाच थेट लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतलेल्या पार्थ यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, हारतील ते पवार कसले? लौकिकार्थाने पार्थ यांचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी ते यामुळे खचले नाहीत. त्यांनी शांतपणे स्वतःला सावरलं आणि नव्या जोमाने पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरायचं ठरवलं. किंबहुना त्यांनी याची तयारीही सुरु केली. कसलाही गाजावाजा नाही, कसलीही खळखळ नाही..ते शांतपणे एक एक पाऊल पुढे टाकत सामाजिक क्षेत्रात आपले पाय घट्ट जमवीत आहेत. त्यांच्या या वेगळ्या शैलीने केवळ युवावर्गाचं नाही, तर राजकारणातील जुन्याजाणत्या लोकांचेही पार्थ यांच्याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उगवते नेतृत्व असणाऱ्या पार्थ अजित पवार यांची ही वेगळी वाट निश्चितच दखल घ्यायला लावणारी आहे.
राजकारणातील अनोखे रसायन असणाऱ्या व महाराष्ट्रातील राजकारणाचं समीकरण ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही ते नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार…! पवारसाहेब यांची राजकीय कारकीर्द पाच दशकांहून अधिक राहिली आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बारामती लोकसभेच्या महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे आणला आहे. याच पवारांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व युवकांचे आशास्थान म्हणजे पार्थ अजितदादा पवार!
आजोबांचा प्रदीर्घ राजकीय वारसा आणि वडिलांची जबरदस्त प्रशासकीय पकड असलेली राजकीय अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन पार्थ राजकारणात आले. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी कडवी झुंज दिली. ते ही यापूर्वी सलग तीनदा निवडून आलेल्या आपल्यापेक्षा दुप्पटीहून अधिक वयाच्या उमेदवाराविरुद्ध. त्यांच्या या कडव्या झुंजीने त्यांनी कार्यकर्त्यांची, महिलांची, युवकांची याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांची मनं तर जिंकलीच.. पण यामुळेच २०१९ च्या वादळी राजकीय वातावरणात लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात सगळ्यात जास्त ‘पार्थ पवार’ हेच नाव जास्त चर्चेत राहिले.
उच्चशिक्षित आणि हाडाचा सामाजिक कार्यकर्ता
पार्थ पवार यांनी मुंबईतील एच. आर. कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. पदवीधर झाल्यानंतर वकिलाची पदवी ग्रहण करण्यास ते लंडन येथे गेले. दोन वर्षानंतर ते यूकेहून परत आले व कौटुंबिक व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित केले. राजकारणात येण्यापूर्वी पार्थ अजित पवार यांनी कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी अगदी चोख पार पाडली. शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले पार्थदादा युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. याला कारणेही तशीच आहेत. त्यांनी जनसेवेचा मार्ग पत्करून सहकाऱ्यांच्या साथीने कोरोना काळात व पूरपरिस्थिती काळात मदत कार्य करीत राहिले. त्यांनी कधीही सामाजिक कामे करताना प्रसिद्धीचा गाजावाजा केला नाही. पवार घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी पार्थ सज्ज असून त्या मार्गाने त्यांची वाटचाल आता सुरू आहे. समाजकारण आणि राजकारण असे दोन्ही बाजू समर्थपणे सांभाळण्याचा प्रयत्न ते प्रामाणिकपणे करीत आहेत.
कुटुंबातूनच समाजकारणाची प्रेरणा
समाजकारणाची प्रेरणा त्यांनी आपल्या आई सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून घेतली. पार्थ यांच्या सामाजिक कामाची चुणूक पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि विद्या प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिर इत्यादींच्या माध्यमातून दिसून येतात. सुरुवातीच्या काळात अनेक उपक्रमांतून पार्थ यांनी पर्यावरणपूर्ण उपक्रमांचा पाठपुरावा केला. अनेक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी अनेक समाजोपयोगी, शैक्षणिक कार्याचा श्रीगणेशा बारामतीपासून केला. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत मावळ लोकसभा मतदार संघातील जनतेला पार्थ दादांचा जवळून परिचय झाला. तिथेही अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबविले. या भागातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न तसेच औद्योगिक विभागातील विविध प्रश्नावर भर दिला.
पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम
“पार्थ पवार फाऊंडेशन” च्या माध्यमातून ते नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाती घेत असतात. ग्रामीण भागासह शहरी भागातील गरजू मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, सायकली पुरविणे यांसारख्या विविध योजना पार्थ दादा पवार यांच्या पुढाकाराने सातत्याने राबविल्या जातात. गरजू, होतकरू मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून अशा मुलांना पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. पार्थ पवार यांच्या प्रयत्नातून पुण्यात रोजगार मेळाव्यामार्फत युवा वर्गासाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठीही उपक्रम हाती घेण्यात येतात.
कोरोनाकाळातही दिला मदतीचा हात
कोरोनाच्या टाळेबंदीत पीडित नागरिकांना मोफत अन्न-धान्य वाटप, गरजूंना किराणा सामान वाटप व वैद्यकीय उपचारांची मोफत सुविधाही पार्थ पवार फाऊंडेशनमार्फत पोहोचविण्यात आली. जिल्ह्यातील कर्तव्य सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, मदतनीस, पोलीस, सामाजिक गट तसेच सर्व नगरपालिका व ग्रामपंचायतींना मोफत मुखवटे व सॅनिटायझर्सचे वाटपही करण्यात पार्थ पवार फाउंडेशन अग्रेसर राहिले आहे. प्रसिद्धीचा हव्यास न धरता सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवत राहण्यावर पार्थ दादा पवार यांचा अधिक भर असतो.
ज्येष्ठांचा आशीर्वाद महत्त्वाचा
पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने एक अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरं राबविले जातात. कर्जत, रायगड, उरण भागांत मोठ्या प्रमाणावर शिबिर राबविले जातात. मोतीबिंदू रुग्णांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून जे. जे. रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली जाते. पार्थ दादा पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभिनव उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना नवी दृष्टी मिळते. पार्थ दादा स्वतः रुग्णांची भेट घेतात. त्यांची विचारपूस करतात. पार्थ दादा म्हणतात ‘या सर्वांचे आशीर्वाद हीच माझी खरी कमाई.’
उद्योगनगरीला गतवैभव मिळवून देण्याचा ध्यास
पिंपरी चिंचवड शहराला अजितदादा यांनी प्रगतीपथावर नेऊन देशात एक वैभव मिळून दिले. आज या शहरांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शहरांत बकालपणा अस्वच्छता वाढली आहे. सर्वसामान्य नागरिक अनेक समस्याने ग्रस्त आहेत. याच्या वेदना पार्थ पवार यांना होतात.
पिंपरी चिंचवड शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
पिंपरी-चिंचवडला बनविणार ‘पर्यावरणपूरक शहर’
पिंपरी चिंचवड शहराला प्रदूषणमुक्त मोकळा नैसर्गिक श्वास घेता यावा याकरिता पर्यावरण पूरक शहर बनवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. शहरांत सध्या जी गुन्हेगारी वाढली आहे. ती कमी करून शहराला गुन्हेगारी दहशतमुक्त बनवून शहरांत सामाजिक सौहार्द्राचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या शहराला स्वच्छता उद्योग राहणीमान या बाबतीत देशातील ‘टॉप १०’ शहरांत ओळख निर्माण करून दिली होती. आज या शहराची अवस्था वाईट झालेली आहे. पार्थ पवार यांचे देशातील ‘टॉप 3’ शहरांत पिंपरी चिंचवड असावे यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. या शहराला सुनियोजित करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील यात शंकाच नाही.
महापालिका भ्रष्टाचारमुक्त करणार
आज पिंपरी-चिंचवडमध्ये दोन आमदारांनी जो भ्रष्टाचाराचा धुमाकूळ घातला आहे. त्याचा शहराच्या प्रगतीवर परिणाम झाला असून महापालिका सामान्यांच्या मूलभूत प्रश्नावर काम करायचे सोडून दोन आमदारांच्या चरण्याचे कुरण बनली आहे. महापालिका भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक कारभार असणारी व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नावर काम करणारी असावी असा पार्थ यांचा ठाम निर्धार असणार आहे.
कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी कायमस्वरूपी तोडगा
पिंपरी-चिंचवड शहरात उद्याने, क्रीडांगणे, शाळा, चांगली आरोग्य सुविधा देऊन शहरातील नागरिकांनी किफायतशीर दरात चांगल्या सोई सुविधा मिळण्यासाठी तसेच त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. शहरातील सर्वात मोठा प्रश्न स्वच्छता व कचऱ्याचा आहे. कचरा विल्हेवाटासाठी कायमस्वरूपी तोडगा त्यांच्याकडे आहे.अजितदादा यांच्या माध्यमातून ते हा प्रश्न सोडवून नागरिकांना ‘स्वच्छ शहर-आपले शहर’ हा अनुभव ते मिळवून देऊ शकतील.
शहराची ‘आयटी हब’ ओळख पुन्हा निर्माण करणार
आज पिंपरी-चिंचवड शहराचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे. सध्या नवीन कंपन्या नवीन उद्योग शहरात येत नाहीत. आहेत ते उद्योग शहर सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. शहराला पुन्हा उद्योगपूरक वातावरण देऊन नवीन व्यवसाय उद्योग आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला आयटी क्षेत्रामुळे मान आहे या क्षेत्राकडे सध्या दुर्लक्ष झालेले आहे. शहरांतील आयटी कंपन्या बंगलोर व इतर शहरांत जात आहेत. आयटी क्षेत्रासाठी पोषक वातावरण निर्माण करून आयटी कंपन्याचे प्रश्न सोडवून आहेत त्या येथे राहतील व नवीन आय.टी. कंपनीज आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील. तसेच शहरामधील बंद पडलेल्या उद्योगांना सुरु करण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पार्थ पवार प्रयत्नशील राहतील.
वडिलांसारखेच सामान्यांच्या मदतीस तत्पर
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा. तो प्रश्न अजितदादा यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. सर्वसामान्यांच्या मदतीला कायम तत्पर असे अजित दादा पवार! आपल्या वडिलांप्रमाणेच पार्थ दादाही अडल्या नडलेल्या सर्वांच्या मदतीला नेहमीच उपलब्ध असतात. त्यांच्या याच स्वभामुळे आज ते कार्यकर्त्यांच्या गळ्यातला ताईत बनले आहेत. येत्या काळात त्यांची सामाजिक कामगिरी अजून उज्ज्वल असेल आणि राजकीय कारकीर्दही उंचावेल यात यत्किंचितही शंका नाही. पार्थदादांची वाटचाल पाहता पुढील ओळी त्यांना समर्पकच ठरतील.