वाई -करोनाबाधिताचा वाई तालुक्यात वाढत असलेला आकडा हा चिंतजनक असून प्रशासनाने कडक उपाययोजना करुन खबरदारी घ्यावी, असे आवाहन आ. मकरंद पाटील यांनी केले. वाई तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बाधितांनी चाळीशी पार केली आहे. त्यामुळे वेळीच उपाय योजना करून करोना नियंत्रणात आणला पाहिजे, त्यासाठी प्रशासनाने बाधित गावामध्ये संचारबंदी कडक राबवावी, यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे व आपल्या कुटुंबासह गावाची काळजी घ्यावी, याबाबत आ. मकरंद पाटील यांनी नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या.
आ. मकरंद पाटील यांनी वाईच्या पश्चिम भागातील आसरे, वडवली, जांभळी, किरोंडे, वासोळे सह इतर गावांना भेटी दिल्या. यावेळी शिरकाव झालेल्या गावांमध्ये तहसीलदार रणजित भोसाले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, उपसभापती विक्रांत डोंगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुरुवारपर्यंत वाई तालुक्यात करोना रुग्णांची संख्या 34 झाली होती, गुरुवारी रात्री जांभळीमध्ये सहा करोनाचे रुग्ण सापडल्याने शुक्रवारपर्यंत 40 करोना रुग्ण झाल्याने वातावरण सुन्न झाले आहे. तसेच सिद्धनाथवाडीत रिक्षा चालकाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने वाडीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे, परंतु कंटेनमेंट झोन कायम ठेवण्यात आला आहे, परंतु वाई शहरात कंटेनमेंट झोनबाबत उलटसुलट चर्चा चालू असून नागरिकांना प्रशासनाकडून घाबरविण्याचे काम करण्यात येत आहे, लॉकडाउननंतर हजारो मुंबईकरांसह परजिल्ह्यातून हॉटस्पॉटमधून नागरिक आल्याने प्रशासनासह गावपातळीवरील सरपंच, पोलीस पाटील व आशा वर्कर यांना मोठा ताण आला आहे. मुंबईकरांनीही क्वारंटाइनचे नियम कडक पाळावे.