पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवरील शहरांमध्ये लागू केलेल्या संचारबंदीमुळे कुटुंबाचे हाल होऊ लागल्याने काही मजूर, कामगार व हातावर पोट असणाऱ्यांनी आपापल्या गावाची वाट धरली आहे. करोनाचा संसर्ग वाढत जाऊ नये, यासाठी पुणे पोलीस व महापालिकेच्या वतीने कामगारांकरिता निवारा केंद्र सुरू केले जात आहेत.
शहरामध्ये करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरून व संचारबंदीमुळे हाताला काम नसल्याने शहरातील काही कामगारानी आपापल्या गावाची वाट धरल्याचे चित्र पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. कामगार त्यांच्या गावी गेल्यास करोना संसर्ग गावापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कामगारांचे गावी होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. पोलीस व महापालिका यांच्यावतीने काही कामगारांसाठी काही ठिकाणी निवारा केंद्र उभारली जात आहेत. त्याच ठिकाणी त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरात वास्तव्यास असणाऱ्या कामगारांनी सध्याच्या स्थितीत त्यांच्या मूळ गावी जाणे धोक्याचे आहे, हे प्रशासन वारंवार सांगत आहे. तर, दुसऱ्या बाजूला पालिकेच्या शाळांमध्ये अशा नागरिकांची निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जात आहे. मात्र, त्यातही अनेक परप्रांतिय कामगारांनी कुटुंबासह पायी प्रवास करत गाव गाठण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे प्रशासनाने आणखी आश्वासक पावले उचलण्याची गरज आहे. यातच नारायण पेठेतील कै. वा. ब. गोगटे प्रशालेत 136 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.