दुबई –वर्ष 2021 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक हा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारतामध्येच आयोजित केला जाणार असून त्याविषयीच्या सर्व शंकांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने आज यावर शिक्कामोर्तब केलं आहे. वर्ष 2021 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान, म्हणजे बरोबर एक वर्षानी होणाऱ्या या स्पर्धेत 16 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज याव्यतिरीक्त पापुआ न्यू गिनी, नामिबीया, नेदरलॅंड, ओमान आणि स्कॉटलंड हे संघही या स्पर्धेत सहभागी होतील.
सध्याच्या घडीला 2021 चा टी-20 विश्वचषक हा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारतातच आयोजित केला जाईल, अशी माहिती आयसीसीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. यावर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 विश्वचषक हा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता पुढे ढकलण्यात आला होता.
त्यामुळे 2020 च्या ऐवजी 2021 सालच्या स्पर्धेचं यजमानपद हे ऑस्ट्रेलियाला मिळणार असल्याचं आयसीसीने याआधीच स्पष्ट केलं होतं. याआधी वर्ष 2016 मध्ये भारतात टी-20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं.
करोनाची परिस्थिती लक्षात घेता स्पर्धेच्या आयोजनात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जातील अशी माहिती आयसीसीने दिली. आरोग्यविषयक सर्व नियम व सहभागी संघातील सर्व सदस्यांची काळजी घेतली जाईल अशी सुविधा बीसीसीआय करेल असं आश्वासन सचिव जय शहा यांनी दिलं.
या निर्णयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रतिनिधींनी आनंद व्यक्त केला असून स्पर्धेच्या तयारीला कमी वेळ असल्याचे सांगितले आहे.