नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळात केल्या जाणाऱ्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सात नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या घोषित केल्या आहेत. यात केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणून काम करणारे थावरचंद गेहलोत यांना कर्नाटकचे राज्यपाल करण्यात आले आहे.
अन्यही राज्यांच्या राज्यपाल पदांमध्येही फेरबदल करण्यात आले आहेत त्यानुसार मिझोरमचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लाई यांना गोव्याचे राज्यपाल करण्यात आले आहे. हरयानाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची बदली करण्यात आली असून त्यांना आता त्रिपुराचे राज्यपाल करण्यात आले आहे. त्रिपुराचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांना झारखंडचे राज्यपाल करण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांना हरयानाचे राज्यपाल करण्यात आले आहे. हरिभाऊ कंभामपट्टी यांना मिझोरामचे राज्यपाल करण्यात आले आहे. मंगुभाई पटेल हे मध्यप्रदेशचे नवीन राज्यपाल असतील. राजेंद्र विश्वानाथ आर्लेकर हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असतील. राज्यपालांच्या नियुक्त्या करतानाहीं जातीनिहाय समतोल साधण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. या नियुक्त्यांनंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग प्रशस्त झाला आहे.