मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी फोन टॅपिंग प्रकरणाचे पडसाद आज विधीमंडळात दिसून आले. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली आहे.
केंद्रीय संस्था जर सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम करत असतील तर त्याचा परामर्श व त्याची काळजी व त्याबाबतीतील चौकशी गृहमंत्र्यांच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अध्यक्षांकडे केली.
अलीकडच्या काळात वर्तमानपत्रात आणि विरोधी पक्षातील लोकांकडून ‘याला ईडी लावतो, त्याला सीबीआय लावतो’ अशी विविध विधाने ऐकायला मिळतात. त्यामुळे विधानमंडळाचा सदस्य या नात्याने सभागृहातील अनेक सदस्यांना केंद्रीय एजन्सी फोन टॅपिंगवर ठेवत असेल तर सभागृहातील सदस्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान केंद्रीय एजन्सीकडून सभागृहातील किती सदस्यांचे फोन टॅपिंगला ठेवले आहेत याची माहिती सभागृहात ठेवावी, अशी गृहमंत्र्यांनी विनंती असल्याचं पाटील यांनी म्हटलं.