पुणे – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. कंगनाने काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कलाकार जावेद अख्तर यांच्याबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य करत गंभीर आरोप केले होते. याबाबत अख्तर यांनी कंगनाविरुद्ध तक्रार दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांकडून तिला समन्स बजाविण्यात आल्याने तिच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कंगना राणावतने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तरच्या प्रतिमेला दुखविणाऱ्या काही गोष्टी केल्या असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत जावेद अख्तर यांनी डिसेंबर 2020 मध्ये अंधेरी कोर्टात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कंगनाला समन्स बजावले आहे.
दरम्यान, कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितले होते की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझे नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते.
त्यांना असे का वाटते की, मी जर ऋतिक रोशनची माफी मागितली नाही तर मला आत्महत्या करावी लागेल. ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापायला लागले होते, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती.