पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर…ताईंनी एखादी इच्छा व्यक्त केली, तर दादांकडून ती तत्काळ पूर्णही व्हायची. त्यावेळी दोघांच्या संभाषणातील हसरेपणा, आपलेपणा सर्वांना दिसून यायचा. मात्र, रविवारी वारजे येथील कार्यक्रमात व्यासपीठावर बोलताना ताईंच्या आवाजातील हळवेपणा आणि भावाच्या बोलण्यातील कठोरपणा यामुळे नात्यातली सहजता हरवल्याचे दिसून आले.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे रविवारी एका कार्यक्रमात एकत्र व्यासपीठावर उपस्थित होते आणि याच व्यासपीठावर त्यांच्यामध्ये होते, देवेंद्र फडणवीस. यावेळी ताई आणि दादांच्या भाषणात सर्वांना भावनारा आपलेपणा मात्र दिसून येत नव्हता. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात “मागील दोन ते अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या समस्या सोडविता येत नसल्याने तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि सत्तेचे विक्रेंद्रीकरण करावे,’ अशी मागणी राज्य सरकारकडे केली.
यावेळी अजित पवार यांनी या निवडणुका का थांबल्या, याची आठवण करून देत “सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने निवडणुका झाल्या नाहीत. आम्हीही लोकांमधून निवडून आलो आहोत. निकाल लवकर लागावा आणि निवणुका व्हाव्यात, अशी आमचीही इच्छा आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून, याची नोंद माझ्या सहकाऱ्यांनी घ्यावी,’ असे पवार यांनी नाव न घेता सुळे यांना सांगितले.
दरम्यान, या आधी हे दोघे व्यासपीठावर असल्यावर सुप्रिया सुळे यांच्याकडून “दादा…’, “माझा दादा…’ असे बोलून विकासकामे किंवा मतदारसंघाशी कामे पूर्ण करण्याची मागणी केली जात होती. त्याला अजित पवारांकडूनही तितक्याच आपुलकी आणि मायेने “अगं सुप्रिया…’ अशा शब्दांत सुरुवात करत त्या मागणीला होकारही दिला जात होता. मात्र, आजच्या कार्यक्रमात बहिणीकडून “दादा’ हा उल्लेख आलाच नाही, तर दादांनीही “सुप्रिया…’ अशी मायेची साद न देता, “आपण सहकारी’ असा उल्लेख केला. त्याची जाणीव उपस्थितांना झाली.