Maha Vikas Aghadi : देशात आगामी लोकसभा निवडणुकांची सर्वच पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच महाविकास आघाडीतही येणाऱ्या निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन गोंधळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) , राष्ट्रवादी काँग्रेस (शारद पवार ) आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरुन धुसफूस सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत जागावाटपावर सविस्तर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. संजय राऊत यांनी काँग्रेसला 23 जागांचे पत्र दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील आपल्या जागांबाबतची भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. मातोश्रीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत दोन तास चर्चा पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 10 ते 11 जागा लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, अमरावती आणि भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चर्चा असल्याचीही माहिती आहे.
अशातच महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर जानेवारीत काँग्रेससोबतउद्धव ठाकरे, शरद पवार गटाच्या वरिष्ठांची बैठक दिल्लीत पार पडणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यासोबतच अमरावती आणि भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चर्चा होणार आहेत.