सरकारकडून ‘या’ संस्थेला दिली ५१ हेक्टर जमीन
मुंबई – ठाकरे सरकारने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यात या संस्थेला राज्य सरकारने ५१ हेक्टर जमीन दिली आहे. मात्र, ठाकरे सरकारचा हा निर्णय वादात सापडला आहे. या संस्थेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार निगडित असून भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
माधव भंडारी म्हणाले कि, या संस्थेला जमीन देण्याचा प्रस्ताव हा गेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित आहे. या आधी महसूल, विधी आणि न्याय विभागाने यावर आक्षेप घेतला होता. मात्र हे सर्व आक्षेप धुडकावत सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. मात्र केवळ या संस्थेशी शरद पवार हे संबंधित असल्याने सर्व नियम डावलून हा निर्णय घेण्यात आला अशे, असा आरोप माधव भांडारी यांनी केला आहे. शरद पवारांवर ठाकरे सरकार हे मेहेरबान झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जमीन देण्यासाठीचा प्रस्ताव गेले ७ वर्षांपासून प्रलंबित होता. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत मराठवाड्यात इन्स्टिट्यूटसाठी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन जालना जिल्ह्यात या संस्थेला ५१ हेक्टर जमीन देत पूर्ण केले. मात्र ठाकरे सरकारचा हा निर्णय विरोधकांच्या पचनी पडलेला दिसत नाही.