नगर – स्वातंत्र्यवीर सावकरांचा कॉग्रेस नेत्यांकडून होत असलेला अपमान उध्दव ठाकरे शांतपणे बघत असल्याचे आश्चर्य वाटते. सतेसाठी विचार सोडणाऱ्या उध्दव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओक असल्याने, स्वताचे मत व्यक्त करण्याचे धैर्य देखील त्यांच्यात राहीले नसल्याची टिका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली. नगर येथे माध्यमांशी ते बोलत होते.
महसूल मंत्री विखे पुढे म्हणाले की, राज्यात आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू असल्या तरी, ही वज्रमूठ केव्हा सैल होईल यांना कळणार नाही. महाविकास आघाडीत सुरू झालेले मतभेद पाहाता तीन पक्षांचे नेतेच भविष्यात एकमेकांवर मूठ उगारल्या शिवाय राहाणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही, त्यामुळे ते वज्रमूठ सभा घेत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले असून, उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल आता सिल्वर ओकवर असल्याने ते स्वत:चे मतही आता मांडू शकत नाहीत. रोज हे सरकार पडेल अशी प्रवक्त्यांची भविष्यवाणी हास्यास्पद आहे. सध्या महाविकास आघाडीत भविष्यकारांची संख्या वाढली आहे, तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाजपशी अलीकडच्या काळात नाव जोडले जात असून, याबाबत अजित पवार हेच अधिक सांगू शकतील, असेही ते म्हणाले.
शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही : विखे
राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. याबाबत एकही शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही. जिल्हा प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून यावर कार्यवाही सुरू असल्याचे महसूल मंत्री विखे यांनी सांगितले.