नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून धुमसत असणाऱ्या मणिपूरमध्ये रोज हिंसाचाराच्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. त्यातच नुकताच दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्यानंतर राज्यातील तणाव हा जगासमोर आला आहे.या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर यावरून राजकारण्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. पावसाळी अधिवेशनात हाच मुद्दा विरोधकांकडून लावून धरण्यात आला आहे. त्यातच आता या प्रकरणावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी मणिपूरमधील घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करून देशाच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली.
बिहारमधील मुंगेर याठिकाणी एकदिवसीय दौऱ्यावर पोहोचलेले रामदास आठवले यांनी मणिपूरमधील हिंसाचारात दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. म्यानमारमधून मणिपूरमध्ये घुसखोरी करून अशी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचे ते म्हणाले. सरकार मणिपूरवर बारीक लक्ष ठेवून आहे. या प्रकरणी आम्ही बोलण्यास तयार आहोत, मात्र पंतप्रधानांना बोलावण्याचा आग्रह धरून विरोधक संसदेचा वेळ वाया घालवत असल्याचाही आरोप आठवलेंनी यावेळी केला.
पुढे रामदास आठवले म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी राज्य सरकारही सातत्याने प्रयत्न करत आहे. मणिपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. महिलांसोबत घडलेली घटना ही मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. देशात अशा घटना घडू नयेत, अशी अपेक्षा देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर,”राज्य असो की केंद्र सरकार या घटनेवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पंतप्रधानांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मणिपूर उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हिंसाचार उसळला आहे, जो 2 महिन्यांपासून सतत सुरू आहे. दोन्ही सोसायट्यांनी एकदा बसून परस्पर सहमतीने तोडगा काढावा, असे आवाहन आम्ही करत आहोत. सरकार दोन्ही समाजाच्या पाठीशी उभे आहे, असा विश्वास देखील यावेळी आठवलेंनी व्यक्त केला.
पुढे त्यांनी, मणिपूरमध्ये ज्या काही घटना घडत आहेत, विरोधकांनी आमच्याशी चर्चा करावी आणि पुढे कोणता पर्यायी मार्ग काढता येईल यावर चर्चा करावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र विरोधक तसे न करता पंतप्रधानांना बोलावण्यावर ठाम आहेत. ते म्हणाले की, आम्ही त्यांना अनेकदा सांगितले आहे की, गृहमंत्री अमित शहा विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार आहेत, मात्र विरोधक केवळ सभागृहाचा वेळ वाया घालवत आहेत. दुसरीकडे, कटिहारच्या घटनेवर ते म्हणाले की, या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही. अशा घटना घडत असतील तर राज्य सरकारने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.