आळंदी -येथील इंद्रायणी घाटावर रात्रीच्या अंधारात कोयता गॅंगच्या गुंडांकडून मारहाण तसेच धमकावून लूटले जात आहे. लॉकडाऊन काळात गुंडाच्या भीतीमुळे घाटावर फिरण्यासाठी येणाऱ्यांचे फिरणेच बंद झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी मोठ्या थाटात इंद्रायणी घाटावर चौकी उभारून उद्घाटन केले होते. लोखंडी केबीनमध्ये सुरू केलेल्या या चौकीत जेमतेम महिनाभर पोलीस थांबले. मात्र, नंतर कुणीही त्याकडे फिरकले नसुन केबीन धूळखात पडली आहे.
आळंदी देहू परिसर विकास समितीच्या वतीने इंद्रायणी नदीच्या दुतर्फा प्रशस्त दगडी घाट बांधल्याने आळंदीकरांना फिरण्यासाठीची सोय झाली. दरम्यान, दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडानमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली, कुदळवाडीतील लघूउद्योग बंद असल्याने कारखान्यांचे सांडपाण्याचे प्रदुषण बंद झाले. परिणामी इंद्रायणी नदीतील पाणी निवळले आणि पाण्यातील दुर्गंधीही बंद झाली.
परिणामी इंद्रायणी काठी रात्रीच्यावेळी फिरण्यासाठी म्हणून वारकरी संप्रदायातील लोक, आळंदीकर महिला, पुरूष जेवण झाल्यानंतर येत. हळूहळू फिरणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा काही गुंड प्रवृत्तीचे युवक घेवू लागले. हातात कोयता घेवून येणाऱ्या जाणाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार इंद्रायणी काठी वाढले. एकट्या दुकट्याला गाठून मारमारी केली जात आहे.
हवेली हद्दीत इंद्रायणी घाटावरील विद्युत दिवे बंद असल्याने याठिकाणी रात्रीच्यावेळी अंधारच असतो. दारू पिणे,छेडछाडी करणे असे अनेक गैरप्रकारही चालतात. घाटावर सध्या बेरोजगार आणि लॉकडाऊनमधे अडकलेले 200 ते 250 लोक रात्रीच्यावेळी झोपण्यासाठी येतात; परंतु अंधाराचा फायदा घेवून कुणाचा मोबाइल, कुणाचे पैसे लुटले जात असल्याने या लोकांमधेही भितीचे वातावरण आहे.
या ठिकाणी वाढल्या चोऱ्या
देहूफाटा आणि पद्मावती झोपडपट्टीतील कोयता गॅंगचे गुंड यामध्ये कार्यरत असल्याची चर्चा आहे. दुचाकीवरून रपेट मारून मोठ्याने आवाज काढून ही तरूणाई पळून जातात. देहूफाटा ते चाकण चौक, घाटावरिल वैतागेश्वर मंदिर, इंद्रायणी नगर ते साधकाश्रम, भक्त पुंडलिक मंदिर या भागात खास करून चोऱ्या करण्यासाठी ही गुन्हेगार मंडळी रात्रीच्यावेळी येतात. यामुळे रात्रीच्यावेळी घाटाच्या दोन्ही तिरावर पुरेशा प्रकाशाकरिता विद्युत दिवे सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.