नवी दिल्ली: गेल्या महिन्यातल्या तणावाच्या तुरळक घटनांनंतर चीनने सीमेजवळ सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे. लडाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेजवळ पान्गोंग त्सो तलाव आणि गालवान खोऱ्याच्या परिसरात चिनी सैन्याची जमवाजमव सुरू असल्याचे आढळून आले आहे. भारतीय लष्कराबरोबर संघर्षाची चीनची भूमिका यातून स्पष्ट होते आहे, असे या भागातील नागरिकांनी सांगितले.
चीनने गेल्या दोन आठवड्यात गालवान खोऱ्याच्या परिसरात सुमारे 100 तंबू उभारले आहेत. तसेच काही बांधकामासाठी लागणारी यंत्रसामुग्रीही या भागात आणली आहे. भारताने केलेल्या तीव्र विरोधाला डावलून ही हालचाल सुरू आहे. सीमेवरील तणावाच्या काळातच लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी लेहमधील 14 कॉर्प्सच्या मुख्यालयास भेट दिली आणि “एलएसी’च्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
सीमाभागात चीनने केलेल्या तयारीप्रमाणेच भारतीय लष्करानेही युद्धसामुग्रीची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे. पान्गोंग त्सो तलावाजवळ 5 मे रोजी दोन्ही सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून तणाव टाळला होता. या हिंसाचारात भारतीय आणि चिनी मिळून 100 हून अधिक सैनिक जखमी झाले होते.
पान्गोंग त्सो मधील घटनेनंतर उत्तर सिक्कीम येथे 9 मे रोजीही अशाच प्रकारची घटना घडली होती. पूर्व लडाखच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्याचेही गेल्या आठवड्याभरात समजले होते. मात्र त्याचे अधिकृतपणे समर्थन केले जाऊ शकले नाही.
गेल्या आठवड्यात भारतीय स्थानिक अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत भारताने पीपल्स लिबरेशन आर्मीने गलवान खोऱ्यात उभारलेल्या तंबूंना जोरदार आक्षेपही घेतला होता. चीनकडून सर्वसाधारणपणे गस्त लपवली जात आहे, असे लष्कराने म्हटले होते. भारतीय लष्कराकडून चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा चीनचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे.