पुणे – राज्यात पुण्यासह नाशिक, जळगाव, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि बुलढाणा या दहा जिल्ह्यांतील सध्या 350 गावांत आणि 1319 वाड्यांमध्ये 369 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
दरम्यान, “भविष्यातील पावसाची स्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाने टंचाईग्रस्त गावे व संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावात पाणी वाटपाचे योग्य ते नियोजन करावे, जेणेकरून पुढील टंचाई कालावधीत पाण्याची उपलब्धता होईल. तसेच भविष्यात लागणाऱ्या टॅंकरसाठी पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन करावे,’ अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
टंचाई कालावधीत करावयाच्या उपाययोजना संदर्भात पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी पाटील यांनी या सूचना दिल्या. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी आदींसह दहा जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
पाणीपुरवठ्याच्या सर्व योजनांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे अभियानस्तरावर सुरू करावीत, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.
ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेऊन टंचाई संदर्भात पुढील उपाययोजना करण्याबाबत नियोजन करावे. तसेच आगामी काळात पर्जन्यमान कमी असल्यामुळे पाणी जपून वापरावे असे आवाहन स्थानिक नागरिकांना करावे. तसेच टंचाईसदृश गावांत जलजीवन मिशन व अन्य पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेऊन त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने तत्काळ नियोजन करण्याचे आदेश पाटील यांनी यावेळी दिले.