कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा निर्णय
बिजींग : चीन मध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने दक्षतेचा उपाय म्हणून भारत सरकारने चीन मधून येणाऱ्या नागरीकांची ई-व्हीसा पद्धत तात्पुरती बंद केली आहे. हा बंदीचा निर्णय तातडीने अंमलात येत आहे. चीन मधून येणाऱ्या विदेशी नागरीकांनाही ही बंदी लागू असणार आहे. चीन मधील ज्या नागरीकांना या आधीच ई-व्हीसा जारी करण्यात आला आहे त्यांचाही व्हीसा रद्द करण्यात आला आहे.
तथापी ज्यांना भारतात येणे अगदीच आवश्यक आहे अशा चीन मधील नागरीकांनी तेथील बिजींग अथवा अन्य दोन ठिकाणी असलेल्या भारतीय दुतावासांशी संपर्क साधावा असे आवाहन भारत सरकारने केले आहे. चीन मध्ये सुमारे चौदा हजार लोकांना कोरोना विषाणुंची लागण झाली असून तिनशेहून अधिक रूग्णांचा तिथे बळी गेला आहे. चीन मधून जगातल्या अन्य देशामध्ये या विषाणुंची लागण झाल्याचे उघडकीला आल्याने जगभर त्या विषयी दक्षता घेतली जात आहे. भारतानेही चीन मधील आपल्या 647 नागरीकांना तेथून विषेश विमानाने मायदेशी आणले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2015 मधील आपल्या चीन दौऱ्याच्यावेळी चिनी नागरीकांना ई व्हीसाची सोय सुरू करण्याची घोषणा केली होती. चीन मधील अधिकाधिक पर्यटक भारतात यावेत या उद्देशाने ही पद्धत सुरू करण्यात आली होती. अमेरिका, सिंगापुरसह अन्य देशांनी आपल्या देशातील नागरीकांना चीन मध्ये जाण्यास निर्बंध घातले असून चीनहून येणाऱ्या नागरीकांवरही तेथे कठोर निरीक्षणाखाली ठेवले जात आहे. जगातल्या अन्य देशांनीही चीनी नागरीकांना व्हिसा जारी करण्याचे तातडीने थांबवले आहे.