मुंबई – यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या अनुयायांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. मात्र, आता या घटनेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. तर या आकड्यावरूनही अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. यावरूनच म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मनातील शंका उपस्थित करताना शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
याच्याआधी आव्हाड यांनी ट्विट करत सोहळ्यात झालेले मृत्यू हे उष्माघातामुळे कि चेंगराचेंगरीमुळे झाले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर यावेळी त्यांनी, पुरस्कार सोहळ्यात 13 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. हा आकडा कमी आहे. सत्य आकडा हा लपवला जात आहे. तर फक्त 13 मृत्यू तर शक्यच नाही असेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच, सरकारच्या ठिसाळ नियोजनावर देखील ताशेरे ओढले आहे.