Telangana Assembly Election 2023: तेलंगणा विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (27 ऑक्टोबर) काँग्रेस आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
अमित शाह म्हणाले, “केसीआर यांना त्यांचा मुलगा केटीआरला मुख्यमंत्री बनवायचे आहे आणि सोनिया गांधींना त्यांचा मुलगा राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे.” दोघेही पुढे कुटुंबवादाचे राजकारण करतात.
तेलंगणातील सूर्यापेट येथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी दावा केला की, भारत राष्ट्र समिती (BRS) किंवा काँग्रेस तेलंगणासाठी चांगले काम करू शकत नाहीत. तेलंगण आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच चांगले काम करू शकते.
काय घोषणा केली?
तेलंगणात भाजपचे सरकार स्थापन झाल्यास मागासवर्गातून येणारा नेता राज्याचा मुख्यमंत्री असेल, अशी घोषणा भाजप नेते अमित शहा यांनी केली. खरे तर त्यांनी हे आश्वासन अशा वेळी दिले आहे जेव्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते जात जनगणनेची मागणी करताना इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) उल्लेख करून मोदी सरकारला कोंडीत पकडत आहेत.
अलीकडेच काँग्रेस कार्यकारिणीच्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले होते की, “आमचे चारपैकी तीन मुख्यमंत्री ओबीसी प्रवर्गातून आले आहेत.” त्याच वेळी, भाजपच्या दहापैकी फक्त एक मुख्यमंत्री ओबीसी समाजातील आहे.
राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात काॅंग्रेसचे सरकार आहे.
पीएम मोदींचा उल्लेख –
गरीब कल्याण हे भाजपचे उद्दिष्ट असल्याचे अमित शहा म्हणाले. तर केसीआर आणि काँग्रेसचे ध्येय कुटुंब कल्याण आहे. कुटुंब कल्याणावर विश्वास ठेवणारे पक्ष तेलंगणाला पुढे नेऊ शकत नाहीत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली फक्त भाजपच तेलंगणाला पुढे नेऊ शकते.