हैदराबाद – तेलंगणा सरकारने असदुद्दीन ओवेसी यांच्या दबावाखाली येत राज्यातील ओबीसी आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण रद्द केले. मात्र भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यावर आम्ही त्यांना पुन्हा हे आरक्षण प्रदान करू असे आश्वासन या पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.
तेलंगणामध्ये ओबीसी आणि एसटींचे आरक्षण हिरावून घेत ते मुस्लिमांना देण्यात आले. आमचे सरकार आल्यावर मुस्लिमांचे आरक्षण रद्द करत ते पुन्हा ओबीसी आणि एसटींना दिले जाईल आणि येथील सगळ्या नागरिकांना अयोध्या येथे श्रीरामाच्या दर्शनासाठी नेण्यात येईल असे शहा म्हणाले. तेलंगणातील निवडणुकीतील प्रत्येक मत हे भारताचे भविष्य निर्धारित करणारे ठरणार आहे असे नमूद करत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली. राव यांनी राज्याला भ्रष्टाचाराचा अड्डा केले आहे.
भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या पक्षाच्या नावाचा खरा अर्थ भ्रष्टाचार रिश्वतखोर समिती असा होतो. त्यांनी अनेक घोटाळे केले असून घोटाळ्यातील पैशांनी तेलंगणात दारूची गंगा वाहते आहे. तेलंगणा सरकारने तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. बीआरएसचे निवडणूक चिन्ह कार आहे मात्र या कारचे सुकाणू ओवेसी यांच्या हातात आहेत.
बेरोजगार युवकांवर अन्याय होतो आहे आणि पेपर लीक घोटाळा प्रकरणात अनेकांनी आत्महत्या केली आहे. आमचे सरकार आल्यावर अडीच लाख युवकांना रोजगार दिला जाईल आणि तेलंगणाच्या विकासासाठी केंद्रातील मोदी सरकारने सर्वप्रकारे मदतच केली आहे असे शहा म्हणाले.