क्विन्सलॅंड – सलामीवीर स्टार फलंदाज स्मृती मानधना हिच्या चमकदार अर्धशतकी खेळीनंतरही अन्य फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे भारताच्या महिला क्रिकेट संघाला यजमान ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाकडून टी-20 मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. पहिला सामना पावसाने वाया गेला होता तर, नंतरच्या दोन्ही सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागल्याने ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-0 अशी जिंकली.
ऑस्ट्रेलियाने भारताला 14 धावांनी पराभूत केले. नाणेफेक जिंकत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 5 गडी गमवून 149 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले. प्रमुख फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय संघ 20 षटकात 6 गडी गमवून 135 धावाच करू शकला.
भारताचा डाव सुरू झाल्यावर शेफाली वर्मा अवघी 1 धाव काढून बाद झाली. त्यानंतर स्मृतीने जेमिमा रॉड्रीक्स या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केली. जेमिमा 26 चेंडूत 23 धावा करून बाद झाली.
स्मृतीने मात्र, अफलातून फलंदाजी करत यजमान संघावर दडपण आणले. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात ती अर्धशतक पूर्ण झाल्यावर लगेचच बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत 13, पूजा वस्त्रकार 5 व हरलीन देओल 2 यांनी साफ निराशा केली.
त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने बेथ मुनीच्या 61 धावा तर, ताहिला मॅकग्रा 44 यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 5 बाद 149 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया महिला संघ – 20 षटकांत 5 बाद 149 धावा. (बेथ मुनी 61, ताहिला मॅकग्रा 44, राजेश्वरी गायकवाड 2-37). भारतीय महिला संघ – 20 षटकांत 6 बाद 135 धावा. (स्मृती मानधना 52, जेमिमा रॉड्रीक्स 23, रिचा घोष 23, निकोल केरी 2-42).