चेन्नई – इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मिळवलेला हा विजय खेळाडूंनी दाखवलेल्या सांघिक जिद्दीचा असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.
पहिल्या डावात रोहितसह ऋषभ पंत व अजिंक्य रहाणेने संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर रवीचंद्रन अश्विनने गोलंदाजीच्या जोरावर पाहुण्या संघाची फलंदाजी अपयशी ठरवली व संघाला मोठी आघाडी घेता आली. तसेच एकीकडे प्रमुख फलंदाज बाद होत असतानाही अश्विनने लढाऊ वृत्ती सिद्ध करताना दमदार शतकी खेळी केली. त्याच्या शतकामुळेच संघाला मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर अक्सर पटेल व अश्विनने पुन्हा एकदा गोलंदाजीत वर्चस्व राखताना इंग्लंडचा दुसरा डावही लवकर गुंडाळला व संघाचा विजय साकार केला, असेही कोहलीने सांगितले.
या कसोटीत माझ्या धावा झाल्याचे समाधान तर आहेच पण पहिल्या कसोटीतील पराभवानंतर खेळाडू निराश न होता व कोणतेही दडपण न घेता खेळले याचे कौतुक जास्त आहे. माझी अर्धशतकी खेळी झाल्यामुळे विश्वास पुन्हा एकदा उंचावला असून आता उर्वरित दोनही कसोटीत अशीच कामगिरी करण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडू सज्ज आहे, असेही कोहली म्हणाला.