नवी दिल्ली – यजमान भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आजपासून येथे सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीत फिरकीच्या तालावर नाचायला भाग पाडलेल्या भारतीय संघाचेच पारडे याही सामन्यात जड राहणार आहे. तसेच ही कसोटी जिंकून चार सामन्यांची मालिका सुरक्षित करण्यासाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( दुसरा कसोटी सामना )
ठिकाण : अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
वेळ : सकाळी 9ः30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस
या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या इयान हिलीपासून अनेकांनी भारतातील खेळपट्ट्यांवर विविध मते व्यक्त केली होती. त्यानंतर नागपूरला झालेला पहिला कसोटी सामना भारताने फिरकीच्या जोरावर जिंकला व मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात पहिल्या डावात भारताच्या फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 177 धावांवर रोखले. त्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव तर पहिल्या डावापेक्षाही लवकर गडगडला. त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या 91 धावंत तंबूत परतला. या सामन्यात भारताचे फिरकी त्रिकुट रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा व अक्सर पटेल यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची वाताहत केली. हा सामना पार पडल्यावरही ऑस्ट्रेलियाला हा पराभव पचलेला नसल्याचे सातत्याने सिद्ध झाले. त्यांनी या पराभवाला आपल्या फलंदाजांच्या बेजबाबदार फलंदाजीपेक्षा खेळपट्टी व ती तयार केलेल्या क्युरेटरला जबाबदार धरले व बीसीसीआयवर टीकाही केली. इतकेच नाही तर त्यांनी नागपूरच्या खेळपट्टीची तक्रार थेट आयसीसीकडेही केली.
याच सगळ्या पार्श्वभूमीवर या दुसऱ्या सामन्यात तरी फिरकी गोलंदाजीचे भूत त्यांच्या मानेवरून खाली उतरणार का व त्यांचे फलंदाज मोठी खेळी करण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या गोलंदाजांपैकी पदार्पण केलेल्या टॉड मर्फीचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही गोलंदाजाला भारतीय फलंदाजांना रोखण्यात यश आले नाही. त्यामुळे आता त्यांच्या संघात काही फेरबदलही करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर श्रेयस अय्यर पूर्ण तंदुरुस्त ठरला असला तरीही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता जवळपास नसल्याचेच दिसत आहे. त्यातही पहिल्या कसोटीत विजय प्राप्त केलेल्या संघात काही बदल होतील असेच चित्र सध्या दिसत नाही.
अश्विन-जडेजाच ठरणार निर्णायक
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर संपूर्ण वर्चस्व राखलेले रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा हेच या सामन्यातही निर्णायक ठरतील. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टीही फिरकी गोलंदाजीलाच साथ देत असल्याचा इतिहास असल्याने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांना अत्यंत जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे. या दोन्ही गोलंदाजांसह पटेलची डावखुरी फिरकी असल्याने त्यांना किती यश मिळते यावरच या सामन्यात त्यांचे यश अवलंबून राहणार आहे.
#INDvAUS 2nd Test : दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी तोबा गर्दी होणार
शर्मांच्या वक्तव्यांचा परिणाम होणार का?
बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये केलेल्या धक्कादायक दाव्यांमुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय खेळाडूंवर त्याचे दडपण निश्चितच राहणार आहे. मात्र, हे दडपण बाजूला ठेवत भारतीय संघ पहिल्या कसोटीप्रमाणे याही सामन्यात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करणार का, हे पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Prithvi Shaw : भारतीय क्रिकेटर ‘पृथ्वी शॉ’ला महिलेकडून मारहाण; सोशल मीडियावर Video व्हायरल
नाणेफेक महत्त्वाची
दुसरा कसोटी सामना राजधानीत होत असून खेळपट्टी देखील फिरकीलाच साथ देणारी ठरते हा इतिहास आहे. त्यातच भारतात हिवाळा संपत आला असला तरीही येथील दवाचा परिणाम पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कामगिरीवर होऊ शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ काय निर्णय घेतो ते महत्वाचे ठरेल. मात्र, सामन्याचे पहिले दोन दिवस वगळता फिरकी गोलंदाजीलाच साथ मिळेल अशी खेळपट्टी दिसत असल्याने चौथ्या डावात फलंदाजी करण्याचे दोन्ही संघ टाळतील.