शिक्षक हा समाजपरिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातील विचारवंत व जबाबदार नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम हे शिक्षकच करीत असतात. म्हणूनच या गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी व गुरू शिष्यांच्या पवित्र नात्यातील संबंध कायमचे टिकवून ठेवण्यासाठी, गुरूंना आदराचे स्थान मिळावे म्हणून शिक्षक दिनाची आवश्यकता असते. शिक्षक दिन का व केव्हापासून सुरू झाला याविषयी थोडक्यात घेतलेला हा आढावा…
शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. म्हणूनच वैदिक काळापासून गुरुचे स्थान निर्माण झाले आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज जरी शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात पहावयास मिळत असले तरी देखील सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी गुरू शिष्यामधील नाते हे अबाधित राहणे काळाची गरज आहे.
भविष्यातील थोर विचारवंत, कलाकार, डॉक्टर, इंजिनिअर, लेखक, तत्वज्ञ, पुढारी, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षकांमध्येच आहे. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार हवा तसा आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो. अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकाच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करत असतो. त्यातूनच भविष्यातील जबाबदार नागरिक घडत असतात. आपल्या आईवडिलांनंतर शिक्षक हे अप्रत्यक्षरित्या आपले पालकच असतात. आपण जादाकरून त्यांच्याच सानिध्यात वाढत असतो. त्यांनी केलेले संस्कार आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडत असतात. प्रसंगी कठोर होऊनही आपल्या बालमनावर सुसंस्कार करण्याचे काम ते करतात. त्यावेळी त्या शब्दांचे आघात होत असलेतरी शब्दांचा मार आयुष्यभर उपयोगी पडतो. त्यामुळेच आपले भावी आयुष्य सफल होऊन जाते.
आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षकाप्रति असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. ती परंपरा आजही नित्यनेमाने सुरू आहे व भविष्यातही सुरूच राहील यात काही शंका नाही. सन 1962 मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरवदिन म्हणून साजरा करण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असे उद्गार त्यांनी काढले होते.
तत्वज्ञान हा त्यांचा आवडता विषय होता. या विषयात त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर ते मद्रास येथील एका महाविद्यालयात नोकरीस लागले. नोकरी करत असताना त्यांनी शिक्षण सोडले नाही. शिक्षण व शिक्षकांविषयी आदर व प्रेम असणारे डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस आजच्या या दिवशी शिक्षकदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानच शिकवित नाहीत तर जीवन जगण्याची कलाही शिकवित असते. आपल्या व्यक्तीमत्वावर ज्यांच्याकडून संस्कार संस्कृती परंपरा, चालिरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यांच्याविषयी आयुष्यभर आदर जपला गेला पाहिजे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे हाडाचे शिक्षक होते. म्हणूनच तर त्यांनी आपला जन्मदिन राष्ट्रपती म्हणून नव्हे तर शिक्षकदिन म्हणून साजरा करा, असे सांगितले होते. त्यांचे थोडेसे विचार सध्याच्या राजकर्त्यांनी अंगी बाळगून आपणही आदर्शवाद जोपासला पाहिजे. अशी भावना मनी बाळगल्यास खऱ्या अर्थाने डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षकदिनाचे स्वप्न साकार होईल, असे वाटते. विद्यार्थ्यांनीही आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
– नारायण सातपुते