निर्भीड, झुंझार पत्रकार आणि लेखक तसेच साप्ताहिक सोबतचे संपादक ग. वा. बेहेरे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे संपूर्ण नाव गणपती वासुदेव बेहेरे; पण महाराष्ट्राला त्यांची ओळख सोबतकार ग. वा. बेहेरे म्हणूनच आहे.
त्यांचा जन्म पुणे येथे 24 सप्टेबर 1922 रोजी झाला. बेहेरे हे मूळचे कोल्हापूरकडील आजरा या गावचे. त्यामुळे त्यांच्या लेखनात आजरा भागाचे उल्लेख अनेक ठिकाणी दिसून येतात. त्यांचे वडील रावसाहेब बेहेरे लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. वडील इंग्लिशमध्ये लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या ‘इरिगेशन मॅन्युअल’ या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून 1,500 रुपये आणि ‘रावसाहेब’ ही पदवी मिळाली होती. त्यामुळे लेखन व वाचन यांचे संस्कार ग. वा. बेहेरे यांच्यावर लहानपणीच झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथील सुलभ शिक्षण संस्थेच्या गोपाळ प्राथमिक शाळेत व माध्यमिक नूतन मराठी विद्यालयातून झाले.
शाळेत असल्यापासूनचे बेहेरे कथा आणि कविता लिहू लागले होते. ते सर परशुराम भाऊ महाविद्यालयात शिकत असताना महाविद्यालयाच्या ‘परशुरामियन’ या वार्षिक प्रकाशनामध्ये ‘गोमंतकाचे अश्रू’ ही कविता छापली गेली. बी. एस्सी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या बेहेरेंनी पत्रकारितेत येण्यापूर्वी सुरुवातीला शिक्षक, शेअर ब्रोकर, प्रॉपर्टी डीलर, हॉटेल मालक, न्यू इंडिया विमा कंपनीतील कर्मचारी अशा विविध ठिकाणी कामाचे अनुभव घेतले.
पत्रकारितेतील स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना मुंबई येथे वर्ष 1974 मधे रोषाला सामोरे जावे लागले. ज्येष्ठ नाट्यसमीक्षक माधव मनोहर यांना घेऊन सोबतच्या वाचक-लेखकांच्या मेळाव्यास जात असताना त्यांना अडवले गेले. मारहाण करण्यात आली व कपडे काढून घेतले. तेव्हा तिथल्याच एका व्यक्तीने फेकलेली लुंगी गुंडाळून ग. वा. बेहरे कार्यक्रम स्थळी पोहचले.तरीही त्यांनी आपण माघार घेणार नाही अशी गर्जना केली. कोणाचेही आर्थिक राजकीय पाठबळ नसताना त्यांनी निर्धाराने ‘सोबत’ चालवले आणि माधव मनोहर, गंगाधर गाडगीळ, रत्नाकर मतकरी, सुभाष भेंडे, नारायण आठवले, वि. आ. बुवा, अनंत मनोहर, रमेश मंत्री, ह. मो. मराठे, बाळ सामंत, य. दि. फडके अशा दिग्गज लेखकांनी त्यांना सहकार्य केले.
बेहेरे यांचे साहित्यामधे 9 कथासंग्रह, 20 कादंबर्या, ललित साहित्य 9 पुस्तके, 1 कवितासंग्रह, 2 नाटके लेखन पुस्तक रूपात प्रकाशित झाले असून त्यांचे ‘आनंदयात्रा’ हे आत्मकथन बहुचर्चित ठरले. ‘कटाक्ष’ या ललित लेखनातून समाजात वावरत असताना एकांतातील सुखानुभवाचे वर्णन केले आहे. माणसांचे अकस्मात भेटणे, निघून जाणे, माणसांची सोबत, लेखकाची आत्मप्रौढी, थोड्याशा कौतुकाने हुरळून जाणारे साहित्यिक, आपल्या मातीतील माणसांकडे होणारे दुर्लक्ष, कलावंतांची मैत्री, अहंकार यावर सुंदर भाष्य केले आहे. अवतीभोवतीचे राजकारण, समाजकारण यातून घडणार्या घटना, प्रसंग, गोष्टी याबद्दलची मते, स्वतःबद्दलचा अभिमान, आरशातील खरा चेहरा यावर जणू कटाक्ष टाकला आहे.
सी. रामचंद्र यांनी वर्ष 1970 मधे राजा ठाकूर यांच्या दिग्दर्शनाखाली बेहरे यांच्या ‘अंकुर’ या त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘घरकुल’ हा कौटुंबिक सामाजिक मराठी चित्रपट प्रदर्शित केला होता. वर्ष 1986 मधे ‘स्वामी’कार रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आजर्यात प्रथमच झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन बेहेरे यांनी केले होते. त्यांचे निधन 30 मार्च 1989 रोजी झाले.