भारताचे पहिले उपराष्ट्रपती जे दुसरे राष्ट्रपती ठरले त्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. एक शिक्षणतज्ज्ञ, तत्वज्ञ, कुशल राजकारणी आणि शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याविषयीची माहिती.
1) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तमिळनाडूतील तिरूथनी येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
2) 1921 मध्ये कोलकत्यातील मेंटल अँड मॉरल सायन्स विद्यापीठातील किंग जॉर्ज (पाचवे) अध्यासनात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याठिकाणी त्यांनी 1932 पर्यंत काम केले.
3) राधाकृष्णन यांचे लंडनमधील भाषण ऐकून त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन एचएऩ स्पेडलिंग यांनी 1936 मध्ये त्यांची ऑक्सफर्ड विद्यापीठात ईस्टर्न रिलिजन्स अँड एथिक्स या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली.
4)राधाकृष्णन यांना साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी 16 वेळा नामांकन मिळाले होते तर अन्य विषयासांठी 11 वेळा नामांकन मिळाले होते.
5)राधाकृष्णन यांच्याविषयी विद्यार्थ्यांना अतिशय आदर आणि आत्मीयता होती. त्यामुळे 1921 मध्ये ते म्हैसूर रेल्वेस्थानकावरून म्हैसूर विद्यापीठात येणार होते तेव्हा त्यांना विद्यापीठापर्यंत आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी फुलांचा रथ तयार केला आणि त्यांना त्यात बसवून विद्यार्थ्यांनी रथ ओढत विद्यापीठापर्यंत आणला.
6)उपरराष्ट्रपती असताना राधाकृष्णन राज्यसभेचे सभापती होते. त्यावेळी सभागृहात कधी आक्रमक चर्चा झाल्या तर सदस्यांना शांत करण्यासाठी ते संस्कृत श्लोक म्हणत किंवा बायबलमधील दाखले देत.
7)1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. 1949 ते 52 या काळात ते भारताचे रशियातील राजदूत होते.
8)1952 मध्ये त्यांची उपराष्ट्रपती पदावर निवड झाली. 1954 मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब देऊन गौरवण्यात आले.
9) 14 मे 1962 रोजी त्यांची राष्ट्रपती पदी निवड झाली.
10)17 एप्रिल 1975 रोजी त्यांचे निधन झाले.