मुंबई – कोविड-19 म्हणजेच करोना विषाणू विरुद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांची टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स, या क्षेत्रातील तज्ज्ञ यांचा समावेश असणार आहे.
करोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार, उपाययोजनांसोबतच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणेदेखील महत्त्वाचं आहे. हा समन्वय आणि त्यांचे नियंत्रण करण्यासाठीच जिल्हास्तरावर ही टास्कफोर्स काम करेल. जिल्ह्याधिकाऱ्यांना अशा प्रकारचे टास्क फोर्स नेमण्याबाबत कळवण्याचे निर्देश अमित देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिले आहेत.
राज्यात सध्या साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात येत असलेल्या या नव्या टास्कफोर्सच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करता येईल, असेही त्यांनी सांगितले.