नगर – जिल्हा परिषदेच्या 519 शाळेच्या आवारांमध्ये विजेचे खांब व तारा असून ते हटविण्यासाठी शिक्षण विभागाने महावितरणकडे यादी दिलेली आहे. या यादी व्यतिरिक्त शाळांचा त्यात समावेश झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.
तसेच अकरा शाळांच्या आवारात खांब व विज तारा नसतानाही ते हलविण्यात आल्याचे शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीत स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर स्थायी समितीच्या सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत मागील इतिवृत्त वाचन होऊन सभेला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने महावितरणकडे जिल्ह्यातील सुमारे 519 शाळांच्या आवारात विजेचे खांब असल्याची यादी सादर करण्यात आलेली आहे. ही यादी महावितरणने जिल्हा नियोजन समितीकडे सादर करून त्यासाठी निधीची मागणी केली होती.
जिल्हा नियोजन समितीने त्यातील 202 शाळांची यादी महाविरणकडे देऊन त्यासाठी 78 लाख 65 हजाराचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार 150 शाळांच्या आवारातील खांब हटविण्यात आलेले असून 41 शाळांतील काम अपूर्ण असून 11 ठिकाणी खांब व तारा नसतानाही ते हटविण्यात आल्याचे शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत केलेल्या पहाणीत स्पष्ट झाले. या अहवालावर स्थायीच्या सभेत चर्चा झाली. त्यावेळी सदस्यांनी या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली.
विशेष म्हणजे जिल्हा नियोजनकडून 202 शाळांची यादी मंजूर झाली. त्यात 69 शाळांची नावे जिल्हा परिषदेने न देता ती आलेली आहे. ही नावे कशी आली असा सवाल सभेत करण्यात आला. शाळांच्या आवारात खांब नसतानाही ते हटविण्यात आल्याचा अहवालात महावितरणने नमूद केलेले त्यामुळे आणखी अकरा शाळांचा समावेश करून घ्यावा, असा आदेश या वेळी महावितरणला देण्यात आला.
शाळांच्या आवारातील हटविण्यात आलेल्या कामाची यादी व जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेल्या यादी व त्या कामावर महावितरणकडून झालेला खर्च याची तपासणी करण्यात यावी, असा निर्णय या वेळी घेण्यात आला. या व्यतिरिक्त ग्रामपंचायतसह विविष विषयांवर चर्चा करून ते मंजूर करण्यात आले.