पुणे -पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची भीषण झळ सोसावी लागते. टॅंकरने पाणीपुरवठा करून या दुष्काळी गावातील नागरिकांची तहान भागवली जाते. मात्र, ही टंचाई कायमची दूर व्हावी, गावे टॅंकरमुक्त व्हावी यासाठी ठोस पावले उचलत जिल्हा परिषदेने 103 गावांची निवड केली आहे. या ठिकाणी 697 कामे प्रस्तावित केली असून, जिल्हा परिषदेतील दोन विभागांसह इतर पाच विभाग सहभागी होऊन एकत्रितपणे कामे करणार आहेत. त्यामध्ये पुरंदर तालुक्यातील सर्वाधिक गावांचा
समावेश आहे.
भोर तालुक्यात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण चांगले असते. सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडतो. मात्र, डोंगरमाथा किंवा पायथ्याला पाणी साठवणुकीची सुविधा नाही. जलस्रोत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात टॅंकरशिवाय पाणीपुरवठा शक्य नाही. येथील 17 गावांमध्ये दरवर्षी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशाच प्रकारे सर्व तालुक्यांमधील गावांचा शोध घेऊन करावयाच्या कामांचा 431 कोटी 86 लाखांचा आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला आहे. या कामांसाठी लागणारा निधी 409 कोटी 77 लाख 86 हजार रुपये जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित करण्यात आला आहे.
तर उर्वरित 22 कोटी 8 लाख 79 हजार रुपयांच्या नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत निधी आवश्यक असल्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सातत्याने टॅंकरग्रस्त गावांना टॅंकरमुक्त करण्यासाठी तसेच पाणी टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम राबविल्याने गावे टॅंकरमुक्त होतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त
करण्यात आला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, मृदा व जलसंधारण अधिकारी, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता लघु बाटबंधारे विभाग यांच्याकडून जिल्हा परिषदेने गावांमध्ये पडणाऱ्या पावसाचे मूल्यमापन करून, कमी-जास्त पावसाच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती संकलित करण्यात येणार आहे. गावांमध्ये असलेले पाण्याच्या स्रोतांची माहिती घेऊन, त्याबाबत आवश्यक असणारी उपाययोजना प्रस्तावित करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
तालुकागाव संख्याएकूण कामेअंदाजित रक्कम (लाख)
आंबेगाव – 81563114.07
बारामती – 118718300.63
भोर – 17431147.38
दौंड – 1618
हवेली – 9791242.09
इंदापूर – 10822730.96
जुन्नर – 86410056.55
खेड – 5591965.37
मुळशी – 651.5
पुरंदर – 191502868.33
शिरूर – 569717.82
वेल्हे – 4101411.31
प्रस्तावित आराखड्यामध्ये डोंगरमाथा ते पायथा पाण्याचे स्रोत निर्माण करणे. सिमेंट बंधारे बांधणे, शेततळे, तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, लघु पाटबंधारे विभागाकडून केलेल्या कामांची दुरुस्तीसह उपलब्ध असलेल्या जलस्रोतांचे बळकटीकरणाची कामे केली जाणार आहेत. कामे पूर्ण झाल्यानंतर या 103 गावांमधील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.
– निर्मला पानसरे, अध्यक्ष, जि.प. पुणे