वंशज डॉ. शीतल मालुसरे यांची नाराजी ः निर्मात्यांना सांगूनही विषय तसाच रेटला
नीरा (वार्ताहर) – नुकताच प्रसिद्ध झालेला तान्हाजी चित्रपटामध्ये शेवटचा भाग इतिहासाच्या विरोधात दाखवला गेला आहे. त्यामुळे खूप वाईट वाटते, अशी खंत तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज डॉक्टर शीतल मालुसरे यांनी व्यक्त केली. त्या नीरा येथे झंकार व्याख्यानमालेत बोलत होत्या.
नीरा येथे लोकनायक प्रतिष्ठानच्या वतीने झंकार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नरवीर तान्हाजी मालुसरे आणि शिवशाही या विषयावर डॉ. मालुसरे बोलत होत्या. याप्रसंगी त्यांनी वीर तान्हाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहास लोकांसमोर जागृत केला. कोंढाण्याच्या लढाईमध्ये उदयभान आणि तान्हाजी यांच्यामध्ये झालेली लढाई त्यांनी लोकांसमोर मांडली.
यामध्ये तान्हाजी मालुसरे यांना लढताना वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर आलेल्या शेलारमामांनी उदयभानाला ठार केले, असे असतानासुद्धा तान्हाजी चित्रपटांमध्ये हे दाखवले गेले नाही. इतिहासातील 80 वर्षांचा योद्धा असलेल्या शेलारमामांवर झालेला हा अन्याय आहे. त्यामुळे खरा इतिहास झाकला जातो. याबद्दल निर्मात्यांकडे मी नाराजी व्यक्त केली; मात्र सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली त्यांनी हा विषय तसाच पुढे रेटला. इतिहासाची अशी तोडफोड करायला नको, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कोळी नव्हेत मराठा
तान्हाजी हे कोळी समाजाचे असल्याचा दावा अनेक कोळी बांधवांनी केला होता; मात्र नरवीर तान्हाजी हे जातीने कोळी नसून मराठा समाजाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत अनेक पुरावे आपल्याकडे असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच तान्हाजीच्या मृत्यूवेळी छत्रपती शिवाजीराजांनी दिलेली “कवड्यांची राजमाळ’ त्यांनी श्रोत्यांना दाखवली.
ग्लॅमर येण्यासाठी इतिहासकारांकडून घोरपडे सरदारांवर अन्याय
“तान्हाजी कोंढाण्याच्या चढाईवेळी घोरपडीच्या साह्याने गड चढून गेले’ यावर त्यांनी आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या की, घोरपडीच्या साह्याने अंधारामध्ये कडा चढून जाणे केव्हाही शक्य नाही. घोरपड नाही तर घोरपडे सरदार हा कडा चढून गेले. कथेला ग्लॅमर यावे म्हणून घोरपडे सरदारांवर त्याकाळी इतिहासकारांनी अन्याय केला. तेच आज तान्हाजी चित्रपटात शेलारमामांबाबत घडले आहे. मी तान्हाजी चित्रपटात घोरपड दाखवण्यास विरोध केला होता.