इस्लामपूर – आपल्याकडे विकास कामे झपाट्याने होत आहेत. भविष्यातही होत राहतील. मात्र आता ग्रामस्थांनी गावाचे आरोग्य निकोप बनविण्यावर भर द्यायला हवा, असे आवाहन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी महादेव मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यास सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिरटे, ता. वाळवा येथील महादेव मंदिर सभा मंडप उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी य. मो. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, राज्य बॅंकेचे माजीअध्यक्ष माणिकराव पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राजारामबापू बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, माजी सभापती बाळासाहेब लाड, दिलीपराव देसाई, पै. हणमंतराव पाटील, परशराम देसाई, एल. आर. पाटील, कुमार मालेकर उपस्थित होते. यावेळी लायन्स क्लबच्या चाइल्ड पार्कच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
ना. जयंत पाटील म्हणाले, आपल्या गावात गेल्या पाच वर्षांत कोणते आजार आले, याची माहिती एकत्र करा. आपल्या गावाचे आरोग्य निकोप ठेवण्यासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, गटारी झाकणे आदी जे-जे करणे आवश्यक आहे, ती कामे प्राधान्याने हाती घ्या. येथील महादेव मंदिर परिसरात एखाद्या आर्किटेक्टला बोलावून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे नियोजन करा, यासाठी पूर्ण सहकार्य करू. तसेच गावातील सीतामाई मंदिराच्या विकासासाठी वाढीव निधीकरिता पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुरेश भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यास जेवढा निधी मिळत नाही, तेवढा निधी ना. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने एकट्या वाळवा तालुक्यास मिळत आहे. तालुक्यात मूलभूत नागरी सुविधा मिळत आहेत.
आम्ही गावांना आदर्श बनविण्यासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, सांडपाणी, कचरा व्यस्थापन, आरोग्य व शिक्षण आदी कामे करणारा प्रकल्प हाती घेतला आहे. माणिकराव पाटील, पी. आर. पाटील, कुमार मालेकर, धारेश्वर महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब लाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शंभूराजे पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर दिलीपराव देसाई यांनी आभार मानले.