श्रीनगर – काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि येथील हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे, अशी सूचना पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे.
पक्ष स्थापनेनिमित्त आज झालेल्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी ही सूचना केली. त्या म्हणाल्या की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चर्चेमुळेच सध्या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे.
जर चर्चेने हा महत्वाचा प्रश्न सुटू शकतो तर काश्मीर प्रश्नावरहीं दोन्हीं देशांनी चर्चा करण्यात काय अडचण आहे असा सवालही त्यांनी केला आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी भारत सरकारने शेजारील देशांशी चर्चा करण्यासाठी अजिबात कचरता कामा नये.
चीननेही भारताची मोठी भूमी व्यापली आहे, त्या भूमीबाबत आपण जर चीनशी चर्चा करू शकतो तर पाकिस्तानशी अशी चर्चा का होऊ शकत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जम्मू काश्मीरचा विषेश राज्याचा दर्जा पुन्हा बहाल व्हावा यासाठी आमचा लढा सुरूच राहील, असे स्पष्ट करून त्यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत हा दर्जा पुन्हा प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे.