बाराबंकी – उत्तरप्रदेशात एक ट्रक रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बसला धडकून झालेल्या अपघातात 18 जण ठार झाले तर अन्य 25 जण जखमी झाले.
लखनौ-अयोध्या मार्गावर राम सनेही घाटात मंगळवारी रात्री हा अपघात झाला. या डबल डेकर बस मध्ये एकूण 130 प्रवासी होते व पंजाब व हरियाणातील प्रवासी घेऊन ही बस बिहारकडे जात होती. या बसचा ऍक्सेल तुटल्यामुळे बस रस्त्याच्याकडेला उभी करून ठेवण्यात आली होती. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला.
ही बस दुरूस्तीसाठी थांबल्याने बस मधील काही प्रवासी खाली उतरले होते, पण अनेक प्रवासी आतच झोपले होते. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या मोठी आहे असे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रकची धडक अत्यंत वेगवान होती.
त्यात 11 जण जागीच ठार झाले तर बाकीचे हॉस्पिटल मध्ये नेले जात असताना मरण पावले आहेत. हे प्रवासी बहुतांशी बिहारी मजुरच होते. ते पंजाब आणि हरियाणात भाताच्या शेतांमध्ये काम करण्यासाठी गेले होते. तेथील काम आटोपून ते बिहार मध्ये परतत असताना हा प्रकार घडला आहे.
काही जखमींना स्थानिक रूग्णालयांमध्ये, तर काहींना लखनौच्या रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सध्या मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळेच हा अपघात झाला असावा असा प्राथमिक निष्कर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून त्यांनील प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना दोन लाख रूपयांची आणि जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.