कर्जत – कर्जत तालुक्यातील अनेक गावांची तलाठी कार्यालये विनाआदेश कर्जत शहरात थाटण्यात आली आहेत. त्यामुळे खेडेगावातील विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांना कार्यालयीन कामे करून घेण्यासाठी कर्जतला हेलपाटे मारावे लागत आहेत.
शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असतानाही तहसील कार्यालयाच्या उशाला आणून ठेवलेल्या तलाठी कार्यालयातून शासनाला नेमके काय साधायचे आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तलाठी कार्यालयातील काम करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोलाचा वेळ आणि आर्थिक भुर्दंड बसत आहे.गावातून तलाठीच गायब झाल्याने या प्रश्नावर तहसीलदार सी.एम.वाघ यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन कार्यालये मूळच्या गावी सुरू करण्याची गरज आहे.
उतारे संगणकीकृत करण्याच्या कामासाठी गावात नेटवर्क उपलब्ध नाही, सर्व्हर डाऊन या नावाखाली कार्यालये कर्जतला हलविण्यात आली. जुने तहसील कार्यालय परिसरात धालवडी, पिंपळवाडी, तळवडी, वालवड, रेहेकुरी, बहिरोबावाडी अशा अनेक गावातील तलाठी कार्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर कित्येक महिने उलटले, ऑनलाइन कामेही पूर्ण झाली तरी पाय सुटलेल्या कार्यालयांनी घरची वाट धरलेली नाही.
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या व नित्याच्या कामांशी निगडित असलेल्या महसूल विभागातील सावळ्या गोंधळाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. विद्यार्थ्यांना गरजेचे असलेले दाखलेही त्यांना गावात मिळत नाहीत. कर्जत येथील कार्यालयात एजंटांकडून कारभार हाकला जात असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर येत आहे. नेमक्या कोणाच्या आदेशाने ही कार्यालय स्थलांतरित करण्यात आली याबाबत अधिकाऱ्यांमध्येही एकमत असलेले दिसत नाही.
तलाठ्यांच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागून गेले आहेत. मात्र माहितीचा अभाव, असंघटित असलेले शेतकरी, गाव पुढाऱ्यांच्या मर्जीने वागण्याची तलाठ्यांची कार्यपद्धती अशा कारणांमुळे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नालाही वाचा फुटत नाही. प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार सी.एम.वाघ यांना या प्रश्नासंदर्भात संपर्क केला, मात्र संपर्क होवू न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही.