महाबळेश्वर -शहरी व ग्रामीण भागाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजनांचा समावेश अर्थसंकल्पात केला आहे. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा, याची खबरदारी शिवसैनिकांनी घ्यावी, असे आवाहन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
शिवसेनेच्या 54 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव, माजी जिल्हाप्रमुख गोपाळ वागदरे, महाबळेश्वर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष राजेश कुंभारदरे, महिला जिल्हा संघटक शारदा जाधव, नगरसेवक कुमार शिंदे, शहरप्रमुख महेश गुजर, तालुकाप्रमुख विशाल सपकाळ, संजय शेलार, माजी शहरप्रमुख सुनील साळुंखे, एस. एस. पार्टे, प्रदीप माने, सचिन वागदरे, लीलाताई शिंदे, प्रवीण कदम, गोपाळ लालबेग, शंकर ढेबे, नितीन भिलारे, संतोष जाधव उपस्थित होते.
ना. देसाई म्हणाले, जिल्ह्याने शिवसेनेचे दोन आमदार दिले. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने शिवसैनिकांची जबाबदारी वाढली आहे. कोव्हिड संक्रमित रुग्णांना आज सर्वाधिक गरज रक्ताची आहे. अनेकांना जीवदान देण्याचे काम शिवसैनिक करत असल्याचा अभिमान आहे, अशा शब्दात प्रा. बानुगडे यांनी रक्तदान शिबिराच्या आयोजनाचे कौतुक केले. प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलानाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. माजी शहरप्रमुख विजय नायडू यांनी आभार मानले. दरम्यान, शेकडोच्या संख्येने शिवसैनिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.