आयुर्वेदात सहा ऋतूंचे वर्णन केलेले आहे. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद व हेमंत. ग्रीष्म (उन्हाळा) ऋतूनंतर येणारा वर्षा ऋतू हा सर्वप्रकारे ग्रीष्माच्या विपरीत असतो. ग्रीष्मातील सर्वांगाची लाही लाही करणारी उष्णता थंडाव्यात बदलते, हवेतील रुक्षतेच्या जागी आता आर्द्रता आपली उपस्थिती दाखवू लागते. वातावरण शीत व उल्हासित करणारे होते. सुरुवातीला हवाहवासा वाटणारा हा ऋतू चांगल्या बदलांसोबत काही वाईट बदलही सोबत घेऊन येतो. यामुळे नंतर मात्र शरीरबल कमी करून व्याधी उत्पन्न होण्यास अनुकूल ठरतो.
हवेतील आर्द्रता व सूर्यकिरणांचा अभाव हा जीवाणू, विषाणीच्या वाढीसाठी पोषक असतो. यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागते; परंतु आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी या ऋतूतील बदलांविरुद्ध राहणीमान व आहार कसे बदलायचे याचे वर्णन करून ठेवले आहे. वर्षाऋतू हा उत्तरायणामध्ये येणारा ऋतू असून या काळात शरीरबल हे कमी असते. तसेच जाठराग्नी मंद झाल्यामुळे पचनशक्ती देखील मंदावते. यामुळेच रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होते.
हा काळ वातदोषाच्या प्रकोपाचा असून या काळात शरीरातील वात वाढतो व तो वातविकारांना वाढवतो किंवा उत्पन्न करतो. पचनशक्ती कमी झाल्याने पचनाचे विकार बळावतात. वात प्रकोपास पोषक वातावरण असल्यामुळे वाढलेला वात हा संधिवात, आमवात, दमा, मणक्यांचे विकार, ज्वर, त्वचाविकार अशा आजारांना उत्पन्न करतो. तसेच या काळातील दूषित पाण्यामुळे देखील अतिसार, काविळ, त्वचाविकार, मलेरिया, टायफॉइड असे विकार उत्पन्न होतात.
यासाठी हे सर्व टाळण्यासाठी व वर्षाऋतूमध्ये देखील आरोग्य चांगले राहण्यासाठी आयुर्वेद ग्रंथांमध्ये विशिष्ट आहार व राहणीमान (ऋतूचर्या) यांचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
वर्षा ऋतूमधे आहार पद्धती
आहार हा ताजा व गरम सेवन करावा, फ्रीजमधील पदार्थ, पेय व भाज्या खाणे टाळावे. त्याने या ऋतूमध्ये वात व कफ वाढून वातविकार तसेच सर्दी चटकन होते.
वेगवेगळ्या डाळींचे किंवा मांसाहारी पदार्थांचे युष (सुप) हे पाचक व जठराग्नीवर्धक असल्याने त्यांचे सेवन करावे. वातवर्धक आहार टाळावा. कटु (तिखट), तिक्त (कडू), कषाय (तुरट) चवीचे पदार्थ या ऋतुत कमी प्रमाणात सेवन करावेत.
हलके मसाले जसे लसूण, आले, हिंग, हळद, मिरे यांच्यासारख्या मधुर, अम्ल, लवण (खारट) रस युक्त पदार्थांचा सुयोग्य वापर आहारात करावा.
पावसाळ्यातील आहार आणि पथ्ये
आहारात पचण्यास हलक्या व ताज्या पदार्थांचा समावेश करावा, यात तांदूळ, गहू तसेच विविध डाळी भाजून यांपासून वेगवेगळे आहार पदार्थ बनवून त्याचे सेवन करावे.
या ऋतूमध्ये मांसाहार टाळावा व मासे तर पूर्णपणे टाळावेत कारण पचनशक्ती मंद असते तसेच मांसदेखील दूषित असण्याची शक्यता अधिक असते. यामुळेच या कालावधीत श्रावण किंवा चातुर्मासाचे पालन केले जाते. हिरव्या पालेभाज्या या ऋतूमध्ये दूषित असतात व त्यावर जीवाणू, विषाणूची अतिरिक्त वाढ होत असते. त्यावर अळ्या व लार्वा यांचीही वाढ होत असते तसेच या कालावधीत असा भाजीपाला वातवर्धक असतो. त्यामुळे तो कमी खावा व खाताना स्वच्छतेची चांगली काळजी घ्यावी.
या कालावधीत बाहेरचे तळलेले व चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते; परंतु त्याने पचनाचे व इतर आजार वाढू शकतात. त्यामुळे भजी, वडापाव, चाट असे पदार्थ टाळलेले जास्त चांगले.
पावसाळ्यातील जीवनशैली
या ऋतूमधे जास्त पावसात जाणे टाळावे जाणे झालेच तर छत्री/ रेनकोट यांचा वापर करावा घरी परत आल्यावर अंग व केस पूर्ण कोरडे करावे, पावसात भिजणे टाळावे.
कपडे योग्य न सुकल्यामुळे बऱ्याचदा त्यात आर्द्रता असते व असे कपडे परिधान केल्यास त्वचाविकार होण्याचा संभव असतो त्यामुळे परिधान करावयाचे सर्व बाह्य व अंतर्वस्त्र चांगले सुकवून मगच वापरावेत.
दिवसा झोपणे टाळावे. दिवसा घेतलेली झोप कफवर्धक असते व ती वर्षा ऋतूत कमी झालेली पचनशक्ती अजून कमी करण्यास मदत करते.घरातील वातावरण स्वच्छ व कोरडे ठेवाव. आजूबाजूस पाणी जास्त काळ जमा होऊ देऊ नये. घरामध्ये अगरू, गुग्गुळ, चंदन, कापूर यांचे धूपण केल्यास जंतुसंसर्ग कमी होतो व वातावरण सुगंधी व आल्हाददायक राहते. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून डासांच्या उत्पत्तीस प्रतिबंध घालावा.
अभ्यंग्यमाचरेन्नित्यं, स जराश्रमवातहा ।
स्नानापूर्वी शरीरास कोमट तेलाने अभ्यंग करणे वातनाशक आहे त्यामुळे या दिवसांत तीळ तेलाने अभ्यंग करावे.
या ऋतूमध्ये प्रकोपित झालेल्या वाताच्या चिकित्सेसाठी बस्ती या पंचकर्माचे वर्णन आयुर्वेद ग्रंथांमध्ये केले आहे. पक्वाशय हे वाताचे मूल स्थान सांगितले आहे. बस्ती ही वाताची उत्तम चिकित्सा असून याने वाताची अर्धी चिकित्सा त्वरित होते यामुळे या ऋतूत बस्ती हे पंचकर्म करून घ्यावे.जास्त शारीरिक श्रम करणे टाळावे, रात्री जागरण करू नये. तसेच मद्यपान टाळावे असे वर्णन आयुर्वेद ग्रंथामध्ये आहे. वर्षा ऋतू हा आजार होण्यास पोषक ऋतू असल्याने सर्वात जास्त साथीचे किंवा संसर्गजन्य आजार यादरम्यान होतात योग्य ऋतूचर्या पाळल्यास व योग्य काळजी घेतल्यास आजारांचा हा ऋतू आनंदी व निरोगी होऊन जाईल.