गोलेगाव – राज्य शासनाने सुरू केलेल्या मिळकतकर माफीबाबतच्या “बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजने”चा चांगला लाभ माजी सैनिक आणि दिवंगत माजी सैनिक यांच्या पत्नी यांना मिळत आहे, आपल्या गावातील लाभार्थ्यांनीही याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील सैनिकी गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोलेगाव (ता. शिरुर) येथे राष्ट्रध्वजास ज्ञानेश्वर कटके यांनी मानवंदना दिली तसेच गावातील शहीद स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
मालेगावच्या सैनिकी परंपरेबाबत अभिमान व्यक्त करीत कटके यांनी राज्य शासनाच्या योजनेबाबत सांगितले की, माजी सैनिकांचे कार्य विचारात घेऊन महाराष्ट्रातील माजी सैनिक व दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नींचा मिळकतकर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला, या निर्णयाची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्षापासून होत आहे.
ग्रामीण भागात राहात असलेल्या सर्व माजी सैनिकांना याचा लाभ होत आहे. मिळकतकर माफीबाबतची “बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजने”ची अंमलबजावणी आपल्या गावातही शंभर टक्के व्हावी.
कटके म्हणाले की, माजी सैनिकांना मिळकत करात अंशतः सूट मिळत होती. परंतु, शासनाने नव्या अध्यादेशाद्वारे शहरी व ग्रामीण भागातील माजी सैनिकांसाठी एकच योजना लागू केली. या योजनेला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.
याचा लाभ आपल्या गावातील प्रत्येक माजी सैनिकाने घ्यावा, असे आवाहन ही कटके यांनी यावेळी केले. यावेळी गोलेगावातील माजी सैनिकांसह जि.प.सदस्य राजेंद्र जगदाळे, पं. स. सदस्य सरोदे, वडगाव रासाई ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र शेलार, मधुकर कटके, राजू कटके आदी मान्यवर उपस्थित होते.
लाभ मिळण्यासाठी आवश्यक !
या योजनेसाठी माजी सैनिक हा राज्यातील कोठेही रहिवासी असावा, यासाठी रहिवासी प्रमाणपत्र सादर करावे लागते, जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे तसेच केवळ एकाच मिळकतीसाठी करमाफी मिळते, माजी सैनिक व त्यांची पत्नी हयात असेपर्यंतच करमाफीचा लाभ मिळणार आहे तर अविवाहित माजी सैनिकांना आई-वडील हयात असेपर्यंतच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जि.प. सदस्य कटके यांनी सांगितले.