पुणे : राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव विकासकाम दाखवा आणि रोख बक्षीस मिळवा अशी अभिनव स्पर्धा आज पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जाहीर केली.
मुळीक म्हणाले, ‘राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असताना खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मेट्रो, पीएमआरडीएची स्थापना, पुणे विकास आराखड्याला मान्यता, भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, समान पाणीपुरवठा प्रकल्प, स्वारगेट मल्टी ट्रान्सपोर्ट हब, चांदणी चौक बहुउद्देशीय वाहतुक प्रकल्प, बस खरेदी, कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी विकासनिधी अशा विविध प्रकल्पांमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळाली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारकीर्दीत शहराचा विकास खुंटला होता. भाजप सत्तेत आल्यावर पुढील ५० वर्षांचा वेध घेत शहरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात झाली.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘मात्र राज्यात महविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पुन्हा शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. गेल्या दीड वर्षांत शहरासाठी एकही नवीन प्रकल्प आणता आला नाही. उलट सुरू असलेल्या विकासकामात खोडा घालण्यात आला. साथीच्या आजारांची जबाबदारी राज्य सरकारवर असताना पुण्याला वाऱ्यावर सोडले. यांना साधे जंबो कोविड सेंटरचे व्यवस्थापन करता आले नाही. शहराला कोणताही निधी उपलब्ध करून दिला नाही. आपले अपयश झाकण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अतिशय केविलवाणे वर्तन करीत आहेत, त्यांची पुणेकर कीव करतात.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘महविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी, स्त्रियांवर अन्याय करणारे आहे. या सरकारमधील माजी गृहमंत्री फरार आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. जनतेच्या हिताचा कोणताच निर्णय सरकारला घेता आला नाही. गोंधळलेल्या सरकारला घेतलेले निर्णय परत घेण्याची नामुष्की ओढवली. विकासकामांच्या नावाने हातात भोपळा आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. याच भीतीने राष्ट्रवादीची नौटंकी सुरू आहे. याला उपरोधिकपणे उत्तर देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्याची उत्तरे ९९२२७४४६४४ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावीत. योग्य व समाधानकारक उत्तर देणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.’